नगर -राष्ट्रवादी कॉंग्रेस नेहमीच विकासाचे राजकारण करीत आले आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून देशासह राज्यात द्वेषाचे राजकारण सुरू झाले आहे. हे राजकारण देशासह सर्वसामान्यांसाठी घातक आहे. हे वातावरण निर्माण करणाऱ्यांनी वेळीच थांबले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी भवन या पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पदाधिकारी संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार नीलेश लंके, आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.
खा. सुळे म्हणाल्या की, नगर जिल्ह्याचे पक्षाची शान वाढविली आहे. एक नाही तर तब्बल सहा आमदार दिले. ज्यावेळी राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष संपला अशी भाषा केली जात होती. त्या काळात जिल्ह्याचे सहा आमदार दिले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्याचा मला सार्थ अभिमान आहे.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, सध्या देशापुढे वेगळे प्रश्न आहेत. कोविडमधून आता सावरलो असतांना महागाईचा सामना करावा लागत आहे.रशिया-युक्रेन युद्धामुळे नवे संकट उभे राहिले आहे.अशा प्रश्नांकडे लक्ष देऊन वाटचाल करणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही ते काम करीत आहोत. सध्या सामान्य जनेतेला भोंग्यावर नव्हे तर महागाईच्या प्रश्नांवर चर्चा हवी आहे. मात्र काही लोकांना वातावरण कलुषित करायचे आहे.