नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला चूक सुधारण्याची संधी दिली आहे. आता सरकारने आर्थिक भरपाईची योग्य रक्कम ठरवण्याचे तरी काम करावे, असा शाब्दिक टोला कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी लगावला.
करोनामृतांच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने खुला केला. त्या आदेशानंतर राहुल यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली. पीडितांना दिलासा देणे हे योग्य दिशेने उचललेले महत्वपूर्ण पाऊल ठरेल, असेही त्यांनी म्हटले.
करोना संकट हाताळणीवरून कॉंग्रेस आणि विशेषत: राहुल सातत्याने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे देशातील करोना संकट तीव्र बनल्याचा आरोप कॉंग्रेसकडून सातत्याने होत आहे. सध्याच्या स्थितीत जनतेला दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजनाही पक्षाकडून सुचवण्यात येत आहेत.
त्याचाच भाग म्हणून कॉंग्रेसने करोनामृतांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी 10 लाख रूपयांची भरपाई देण्याची मागणी याआधीच केली होती. करोना संसर्गामुळे देशात आतापर्यंत जवळपास 4 लाख बाधित दगावले आहेत.