मुंबई/पुणे, दि.11 -निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना नवी नावे आणि चिन्हं बहाल केली. त्यावरून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा आणि मिम्सचा अक्षरश: पाऊस पडत आहे. त्याचा ट्रेंड पाहता सोशल मीडियावर ठाकरे गटाची चलती असल्याचे आणि शिंदे गटाला प्रतिकूल प्रतिसाद असल्याचे आढळते. ठाकरे गटाला सहानुभूती, की खरोखरीच वाढता पाठिंबा ते पुढील काळात दिसून येईल.
शिवसेनेवर दावा सांगणाऱ्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाच्या अंतरिम निर्णयाने धक्का दिला. आयोगाने केवळ शिवसेना हे नाव वापरण्यास मनाई केली. तसेच, धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. आता आयोगाने दोन्ही गटांना स्वतंत्र नावे आणि चिन्हे मंजूर केली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट आता “शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नावाने ओळखला जाईल. तर, एकनाथ शिंदे यांच्या गटाला “बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले आहे.
दोन्ही गटांना कुठले नाव, चिन्ह मिळणार याविषयी राज्यभरात कुतूहल होते. साहजिकच, नावं आणि चिन्हं निश्चित झाल्यानंतर अनेक जण सोशल मीडियावरून व्यक्त झाले. त्यांनी शिंदे गटाची खिल्ली उडवण्याचीही संधी साधली. नावात बाळासाहेब असल्याने दोन्ही गटांनी समाधान व्यक्त केले. पण, ते बाळासाहेब नेमके कोण, असा सवाल करत प्रतिक्रिया देणाऱ्या अनेकांनी बाळासाहेब या नावाच्या इतर नेत्यांचाही उल्लेख केला. त्यातून शिंदे गटाला डिवचण्यात आले. शिंदे गटाकडून वारंवार धर्मवीर आनंद दिघे यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या नावाचा वापर त्या गटाने का केला नाही, अशी विचारणाही सोशल मीडियातून केली गेली.
या लढाईवरून ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न शिंदे गटाचा असल्याचे चित्र निर्माण झाले. अर्थात, सोशल मीडियावर ठाकरे गटाच्या बाजूचा कल जनमताचा कौल मानता येऊ शकणार नाही. तो निवडणुकांमधूनच समजेल. पुढील महिन्याच्या प्रारंभी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. ती जनमताचा कौल जाणण्यासाठीची पहिली परीक्षा ठरेल. शिंदे गट ती पोटनिवडणूक लढवणार की नाही ते अद्याप अस्पष्ट आहे. निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यास तो गट टीकेचा धनी बनू शकतो. निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यास तो गट आणखी टीकेचा धनी बनू शकतो. पोटनिवडणुकीचे कारण पुढे करून त्या गटाने निवडणूक आयोगाकडे जाण्याची लगबग केली. त्यामुळे पोटनिवडणूक न लढवल्यास एवढा अट्टाहास कशासाठी केला, या प्रश्नाला त्यांना सामोरे जावे लागेल. राज्याच्या राजकारणात ठाकरे आडनाव एक ब्रॅंड आहे. ठाकरे गटाला तो ब्रॅंड मिळाला आहे. पण, शिंदे गट त्यापासून वंचित राहिला आहे.
निवडणूक आयोगही निशाण्यावर…
निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अंतरिम स्वरूपाचा आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची हा प्रश्न तूर्त तरी अनुत्तरितच राहिला आहे. त्यावरून सोशल मीडियावरून काही जणांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. “शिवसेना कुणाची हे अनेक वर्षांपासून पाकिस्तानला सुद्धा ठाऊक आहे. पण, भारताच्या निवडणूक आयोगाला त्या प्रश्नाचे उत्तर सांगता येत नाही,’ अशा स्वरूपाची प्रतिक्रिया पुढे आली.