प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 22 – करोना संसर्गाच्या परिस्थितीत अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थितीची सक्ती करु नये, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्याकडे दिले आहे.
यावेळी महासंघाचे राज्य सरचिटणीस विनायक लहाडे, सरचिटणीस विठ्ठल वाघमारे, विभागीय सहसचिव आर. टी. चव्हाण, माहिती सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, माहिती सचिव तथा माहिती अधिकारी वृषाली पाटील, सदस्य तथा शाखा अभियंता मनोहर खाडे, तहसीलदार विवेक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
करोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांची कार्यालयीन उपस्थिती 100 टक्के करु नये, अधिकारी, कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा द्याव्यात, 50 लाख रुपयांचा विमा मंजूर करावा, करोना संसर्ग तातडीचा, आकस्मिक आजार घोषित करुन त्याच्या संपूर्ण वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती द्यावी. विलगीकरण किंवा अलगीकरणासाठी स्वतंत्र रजा मंजूर करावी आदी मागण्यांसाठी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. पुण्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.कटारे यांनी निवेदन स्वीकारले.