पुणे – केंद्र शासनाच्या स्वच्छता कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा पहिला टप्यात हगणदारी मुक्त करण्यात आला. यात सर्वांना वैयक्तीक स्वच्छतागृहे बांधण्यात आली. आता या अभियानाच्या दुसऱ्या टप्यासाठी जिल्ह्याची निवड झाली असून त्यामध्ये सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन केले जाणार आहे. यासाठी वर्षभराचा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.
केंद्र शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा 2017 मध्ये हगणदारी मुक्त करण्यात आला. यात जिल्ह्यातील 6 लाख 36 हजार 36 कुटुंबांपैकी 1 लाख 74 हजार 639 तसेच पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेले 1 लाख 90 हजार 83 अशा एकुण 1 लाख 93 हजार 725 कुटुंबांनी वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधली. याच अभियानाचा आता दुसरा टप्पा जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे.
या टप्यात प्रामुख्याने जिल्ह्यातील घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. त्यामध्ये घनकचऱ्याचे संकलन आणि वर्गीकरण, ओला सुका कचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया, गावातील स्वच्छता, प्रकल्पाची देखभाल दुरूस्ती, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन, कचरा कुंड्याची सुविधा, कचरा वहनासाठी वाहनांची व्यवस्था, खतासाठी गोडाऊन करणे ही कामे केली जाणार आहे.
यासाठी विविध प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. औद्योगिकरण आणि नागरिकीकरण वाढत असल्याने गावस्तरावर कचरा व्यवस्थापनासाठी गुगल अर्जाद्वारे गावागावातील माहिती मागवली. या माहितीच्या आधारे प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार घनकचरा प्रकल्प आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी शाखा अभियंता, उपअभियंता यांच्याकडून मान्यता घेऊन कामांना सुरूवात केली जाणार आहे, असे पानसरे यांनी सांगितले.