विश्वास वसेकर हे साहित्यातील कवितेपासून कादंबरीपर्यंत, कथेपासून ललित लेखनापर्यंत, बालसाहित्यापासून समीक्षेपर्यंत मुशाफिरी करणारे लेखक. आठ कवितासंग्रहांसह एकूण अठ्ठावन्न साहित्यकृती त्यांच्या नावावर आहेत. कवितासंग्रहातील विचारधारेशी त्यांची कविता बांधिलकी जपते. त्या सगळ्या कवितांचा एकत्रित विचार केल्यास वसेकरांची कविता पूर्वकालीन नामवंत कवींच्या कवितेशी नातं सांगताना दिसते.
संख्यात्मक विचारावर फुली मारून लेखकाने आपले लेखन किती समाजाभिमुख, किती मानवतावादी, किती सर्मसमावेशक, किती जीवनवादी हे तपासायला हवे. त्या अनुषंगाने वसेकर यांच्या लेखनाकडे बघताना ते समाजातील धर्मांधतेवर, जातीयवादावर, राजकीय ऱ्हासावर, सामाजिक दांभिकतेवर कडाडून हल्ला करताना दिसतात. परंतु असा हल्ला चढवताना वसेकरांचे शब्द ओंगळवाणे, बटबटीत रूप धारण करीत नाहीत. आक्रस्ताळी आक्रोश करत नाहीत. संयमित शब्द हाताशी धरूनही वसेकर इच्छित परिणाम साधतात. समाजातील दांभिकतेचे सालटे काढतात. पण आपले लेखन शब्दबंबाळ होणार नाही याची दक्षता घेतात.
स्वातंत्र्य, समता, बंधुता हीच ती तीन मूल्ये. या तीन मूल्यांभोवती या संग्रहातील कवितांची मांडणी असल्यामुळे “मूल्यत्रयीची कविता’ हे कवितासंग्रहाचे शीर्षक. यातली कविता स्वातंत्र्य, समता, बंधुता या तीन मूल्यांच्या आड येणाऱ्या प्रत्येक बाबींवर हल्ला करते. शब्दांचे कोरडे ओढते.
वसेकरांनी वडाची मॉरफॉलॉजी, मृगजळ, आयुष्याच्या संदर्भात, जांभई, प्रस्थापित, समतोल आहार अशा कितीतरी कवितांमध्ये परिस्थिती शरण माणसाची वेदना मांडली. ही वेदना मांडताना भोवतालचं आकलन, निरीक्षण, पृथक्करण, कार्यकारण संबंध अशा विभिन्न बाबींचं वसेकरांचं भान थक्क करणारं आहे. “दैनंदिनी’ या कवितेत माणूस पोराबाळांसाठी स्वतःची घालमेल कशी गिळतो याचं फार यथार्थ वर्णन आहे. वडाची मॉरफॉलॉजीया कवितेत वसेकर म्हणतात-
झोपेतही स्वप्नं पडतात
…आभाळातल्या चांदण्या म्हणजे
निळ्या छताला पडलेली भोकं आहेत गोळ्यांची
त्या पलीकडे मशीनगन्स आहेत
चंद्र तर मोठ्या तोफेचे तोंड
समाजातील धर्मांधता कवीला मारक वाटते. खंडप्राय देश, प्रियदर्शन, निदान, अधिवेशन, कालकुपी, मंडळ आयोग, भारतधर्म, अयोध्या अशा अनेक कवितांमध्ये वसेकरांनी धर्मांधतेवर परखड भाष्य केले आहे. “शेतकऱ्याची आत्महत्या’ या कवितेत त्या प्रश्नाविषयी-
पोस्टमार्टमनंतर त्यांचं प्रेम नातेवाईक म्हणून
सत्तारूढ पक्षाला देऊ करण्यात आलं
तेव्हा त्यांनी ओळख पटवायला नकार दिला
आणि विरोधी पक्षानं त्यांच्याकडं
ढुंकूनही न पाहता रुदालीसारखा टाहो फोडला
अशा शब्दांत राजकीय उदासीनतेवर आणि स्वार्थी वृत्तीवर नेमकेपणाने भाष्य केलं आहे. अत्यंत वेगळ्या कल्पना, प्रतिमा, प्रतीकं, शब्दकळा ही वसेकरांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. मॉरफॉलॉजी, स्टिम्युलेशन, ट्रॅंक्विलायझर असे इंग्रजी शब्द मूल्यत्रयीमध्ये भेटतातच. पण वळवळवीत, बावण्या, बाहेरबाधा, होत्साते, ऋणप्रबलन, बुतशिकन, कुचळेल, भळ, हृद्यकुंज, हेंडगुळा असे सर्वसामान्यपणे कवितेत न भेटणारे कितीतरी शब्द “मूल्यत्रयीची कविता’ या कवितासंग्रहात भेटतात. यातल्या कल्पना वाचकाला अचंबित करतात.
हार्ड कोअर पुठ्ठा बांधणी, अनिल उपळेकरांचे समर्पक मुखपृष्ठ या पुस्तकाच्या जमेच्या बाजू आहेत. संस्कृती प्रकाशनाच्या सुनिताराजे पवार यांनी अत्यंत देखणं पुस्तक वाचकांच्या हाती ठेवलं आहे.
विजय शेंडगे