पर्यटन… तीर्थक्षेत्रांना भेट या गोष्टी हा मानवी स्थायीभाव आहे; पण तो डोळसपणे करणे आणि त्या ठिकाणातील सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक बाबींसह वातावरण, पर्यावरणातील गोष्टीही टिपणे हे खरे तर त्या व्यक्तीचे कौशल्य असते. मुळातच ती एक दृष्टी लागते आणि डॉ. राजेंद्र यादव यांनी लिहिलेल्या “जगन्नाथ ः पुरी-कोणार्क-भुवनेश्वर’ या पुस्तकातून दिसून येते. मुखपृष्ठावरील सूर्य मंदिराने स्थापत्यकलेचा एक सुंदर अनुबंध त्यांनी साधला आहे. करोनाचे निर्बंध शिथिल झाल्यावर जगन्नाथपुरी-कोणार्क-भुवनेश्वर अशी ट्रिप केली आणि त्यांच्या अनुभवांवर, दृश्यसंकल्पांवर त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. मात्र, पुस्तक लिहीत असताना त्यांनी प्रत्येक ठिकाणच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थलदर्शनाचा सुयोग्य वापर छायाचित्रांच्या माध्यमातून केला आहे, त्यामुळे या पुस्तकाला एक वेगळेपण प्राप्त झाले आहे.
भुवनेश्वर, धौलीगिरी, लिंगराज मंदिर, राघुराजपूर, उदयगिरी-खंडगिरी, कबीर मठ, शंकराचार्य मठ, कोणार्क सूर्यमंदिर ही प्रकरणे वाचताना त्या विश्वात आपण सहज रमून जातो. यात शेवटचे प्रकरण “जगन्नाथ पुरी’चे आहे. जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्तींचे, त्यातील भावभावनांचे आणि त्या मूर्तीचे देवत्व लेखकाने उत्तम टिपले आहे. या मूर्तींची ठेवण वेगळी आहे, त्याची माहिती ही प्रत्यक्षच वाचलेली बरी, असे नक्कीच वाटून जाते. याबाबतच्या अख्यायिका किंवा काही प्राचीन संकेतही त्यांनी आपल्या लेखनातून स्पष्ट केले आहेत.
उदा. या प्रकरणातील “नवकलेवर विधी” हा भाग वाचताना लक्षात यते की, जगन्नाथ, सुभद्रा, बलराम आणि सुदर्शन चक्र यांची 8, 12 आणि 19 वर्षांनी लाकडी मूर्ती नव्याने बनवल्या जातात. त्याला “नवकलेवर विधी’ म्हणतात. या प्रत्येक मूर्तीच्या घडणीसाठी वेगळ्या प्रकारचे लाकूड वापरले जाते. कडुलिंबाच्या झाडाचे म्हणजे ज्याला “ब्रह्मखोड’ म्हणतात, असे पवित्र चिन्ह असलेल्या झाडाचे लाकूड यासाठी वापरतात. ही आणि त्यानंतरची माहिती खूपच रोचक आणि दिङ्मढ करणारी अशी आहे.
कोणार्कच्या मंदिरातील शिल्पकला कलिंगा स्थापत्यशास्त्रानुसार साकारलेली आहे. मुळात हे मंदिरच या शास्त्रावर आधारलेले आहे. प्राचीन भारतातील वारसा, वैज्ञानिक, खगोल आणि स्थापत्यशास्त्र यांचा हा एक उत्तम ऐतिहासिक पुरावा आहे. या मंदिरासाठी 52 टनी चुंबकाचा वापर केलेला आहे. “जागतिक वारसा स्थळ’ म्हणून युनोस्कोने या मंदिराला 1984 मध्ये जाहीर केले आहे. एकूणच भारतीय संस्कृतीचा हा उत्तम ठेवा आहे.
“मंगलाजोडी’ हे प्रकरण खरे तर विशेष आकर्षित करून घेणारे आहे. ओरिसातील चिल्का सरोवराच्या परिसरातील हे “पर्यावरण पर्यटन’ स्थळ आहे. हिवाळ्यात तीन लाख पक्ष्यांनी हे नंदनवन फुललेले असते. तीन तासांच्या होडीच्या प्रवासातून हे पक्षी आणि येथील तळ्याचे निरीक्षण करता येते. ओरिसामधील हा संपूर्ण प्रदेशच लेणी, मंदिरे, तळी आणि निसर्गाने समृद्ध असा आहे. हे पुस्तक येथील पर्यटनाला जाणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारेच आहे; पण त्याचबरोबर या परिसराच्या विविध प्रकारच्या अभ्यासकांसाठीही पूरक असेच ठरणारे आहे.
मिलन म्हेत्रे
एकूण पृष्ठे – 114
किंमत – 300 रुपये