सोलापूर – राज्याचा गृहमंत्री वसुली प्रकरणात कारागृहात बंद होतो, हे राज्यासाठी अतिशय लाजिरवाणे आहे. हे राज्य सरकार तर वसुलीचे सरकार आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.
सोलापूर दौ-यावर असताना अक्कलकोट येथे त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस म्हणाले, आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. स्वामी कृपेनेच जीवनात आरोग्य, स्थैर्य, समाधान आहे. त्यामुळे अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा मानस होता. ती इच्छा आज पुर्ण झाली.
याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी फडणवीस यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला.
स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर जाता जाता त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून मंदिरात होत असलेल्या विविध विकासाभिमुख कामे पाहून व मंदिर समितीचे उपक्रम जाणून घेऊन समाधान व्यक्त केले.