सहकारनगर – दहा वर्षांत मतदारसंघात नागरिकांच्या मूलभूत सुविधांचाही कामे झाली नाहीत. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मतदारांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यास जे दहा वर्षांत झाले नाही, ते पाच वर्षांत करून दाखविणार, असा विश्वास पर्वती विधानसभा मतदारासंघाच्या महाआघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांनी व्यक्त केला. कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत त्या बोलत होत्या.
कदम म्हणाल्या, गेल्या 15 वर्षांपासून नगरसेविका म्हणून सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यात मूलभूत सुविधांसह अनेक लोकोपयोगी कामांचा समावेश आहे. भविष्यातही ही कामे आपल्याकडून सुरूच राहणार आहेत. त्यामुळे मतदार गेल्या पंधरा वर्षांतील कामे पाहून आपल्याला नक्की संधी देतील, असा विश्वास यावेळी कदम यांनी व्यक्त केला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दत्तवाडी, जनता वसाहतीतील नागरी समस्या सोडवणार
मंगळवारी कदम यांनी दत्तवाडी, जनता वसाहत, पानमळा, वारकरी भवन, सर्वे. नं 133 परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळीही त्यांनी मतदारांशी संवाद साधत, या भागातील समस्या सोडविण्यासाठी आपले प्राधान्य राहणार असल्याचे स्पष्ट केले. सत्ताधाऱ्यांकडून केवळ आश्वासने दिली जात असून ती पूर्ण करण्याबाबत काहीच बोलले जात नाही. त्यामुळे आपला प्रत्यक्ष कामावर भर राहणार असल्याचे अश्विनी कदम यावेळी म्हणाल्या.