पणजी : सर्वसमावेशक महोत्सव बनवण्याच्या उद्देशाने 50 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सुगम्य भारत-सुगम्य चित्रपट’ विभागाअंतर्गत विशेष गरजा असणाऱ्यांसाठी तीन चित्रपट दाखवले जाणार आहेत.
इफ्फी, सक्षम भारत आणि युनेस्को यांच्यातील हा संयुक्त उपक्रम आहे. श्राव्य माध्यमातून विकलांगांसाठी सर्वसमावेशक अवकाश निर्माण करण्याला प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे.
राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाने या विभागाचा प्रारंभ झाला. महोत्सव संचालक चैतन्य प्रसाद, ईएसजीचे उपाध्यक्ष सुभाष फलदेसाई, ईएसजीचे सीईओ अमित सतीजा आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांनी हा शुभारंभ केला. पोंडा येथील लोकविश्वास प्रतिष्ठान अंध शाळा आणि नॅबचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
अशा प्रकारचे चित्रपट बनत असल्याचे पाहून आश्चर्य वाटल्याची प्रतिक्रिया या महोत्सवाला प्रथमच उपस्थित राहिलेल्या अभिनेत्री तापसी पन्नू हिने व्यक्त केली. दृश्ये समजावून सांगण्यासाठी श्राव्य माध्यमाचा वापर करणारे चित्रपट आपण पाहिलेले नाहीत, त्यामुळे ते कसे केले जाते ते मला पहायचे आहे असे ती म्हणाली. दृष्टीहीन हा शब्द वापरणे मला आवडत नाही. कारण तुमची अन्य ज्ञानेंद्रिये आमच्यापेक्षा तल्लख असतात.
अशा प्रकारचे चित्रपट तुमच्यापर्यंत पोहचत आहेत याबद्दल आनंद झाल्याचे तापसी पन्नू यांनी नमूद केले. भविष्यात आपलेही चित्रपट ऑडिओ चित्रपटात रुपांतरीत होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या विभागात ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘एम.एस.धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ आणि ‘क्वेस्टाओ डि कन्फ्युसाओ’ हा कोंकणी चित्रपट दाखवला जाणार आहे.