सत्ताकारणात भरणेंची भूमिका महत्त्वाची
रेडा – इंदापूर तालुक्यामध्ये अजित पवारांचे विश्वासू म्हणून इंदापुरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे पाहिले जाते, तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळचे म्हणून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मान दिला जातो. याच कारणातून साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ टाळून हर्षवर्धन पाटील मुंबईकडे रवाना झाले तर आमदार भरणे हे तालुक्यातील विवाह सोहळे सोडून मुंबईकडे गेले, असे असले तरी तालुक्यातील कट्टर राजकीय विरोधक पाटील आणि भरणे हे दोघे एकाच पक्षात येणार का? अशी चर्चा आहे.
राजकीय घडामोडीचा थेट परिणाम इंदापुरातील तालुक्यावर होत आहे. इंदापुरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची राजकीय सुरुवात ते आजपर्यंतची कारकीर्द अजित पवार यांच्यामुळे सोयीस्कर झाली आहे. विधानसभा निवडणुकीतही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी भरणे यांना मोलाची साथ दिली. परंतु, खुद्द शरद पवार यांनीही आमदार भरणे यांना निवडून आणण्यासाठी मोठी भूमिका निभावली असल्याचे भरणे विसरणार नाहीत, हे मात्र निश्चित. आता, अजित पवार आणि त्यांचे काही सहकारी आमदार भाजप सरकारला पाठींबा देत आहेत. याच पक्षात पवार आणि भरणे यांचे कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील पूर्वीच दाखल झाले आहेत. त्यामुळे दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांच्याबरोबर गेले तर भरणे आणि पाटील पुन्हा एकाच पक्षात येतील.
यामुळे इंदापुरातील कोणत्या नेत्याला या पक्षात मान मिळणार? आमदार भरणे अजित पवारांच्या मागे जाणार की शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा बारोबर उभे राहणार, याचे कोडे तालुक्यातील जनतेला पडले आहे.
दोघांचीही उडाली लगबग…
भाजप सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर अजित पवार यांचे फोन सर्वत्र खणखणले. त्यावेळी आमदार भरणे हे तालुक्यातील विवाह सोहळे पार पाडत होते. मला काहीही माहिती नसल्याचे तसेच माझा कोणाशी संपर्क झालेला नाही, असे सांगत असतानाच त्यांनी मुंबईला निघण्याची लगबगीने तयारी केली तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही नीराभिमा काखान्याच्या गळीत हंगामाचा शुभांरभ सोडून तातडीने मुंबई गाठली. इंदापुरातील या दोन्ही नेत्यांच्या भूमिका या काळात महत्त्वाच्या ठरणार आहेत.