नवी दिल्ली – भारतात बंगळुरू येथील विमानतळावर आपल्याला तब्यात घेण्यात आले होते व तेथूनच आपल्याला लंडनला परत पाठवण्यात आले असा दावा ब्रिटनच्या वेस्टमिंस्टर विद्यापीठातील प्राध्यापिक निताशा कौल यांनी केला आहे. कौल या भारतीय वंशाच्या असून कर्नाटक सरकारच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
लंडनमध्ये राहणाऱ्या कौल या काश्मीरी पंडित आहेत. त्यांनी या प्रकारासंदर्भात एक्सवर आपल्या पोस्टची मालिकाच सुरू केली आहे. यात त्या म्हणतात की बंगळूरू विमानतळावर अधिकाऱ्यांनी त्यांना तब्यात घेतले मात्र याचे कारण त्यांनी सांगितले नाही. तुम्हाला भारतात प्रवेश करण्याची परवानगी नाही अशा आशयाची कोणतीही नोटीस अथवा सूचनाही भारत सरकारकडून आपल्याला देण्यात आली नव्हती.
दरम्यान, कर्नाटकातील सिध्दरामय्या सरकारने २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी दोन दिवसांचे संविधान आणि राष्ट्रीय एकता संमेलन आयोजित केले होते. त्यासाठी लेखिका, कादंबरीकार आणि कवयित्री असलेल्या कौल यांनाही बोलावण्यात आले होते.
सोशल मीडियावर कर्नाटक सरकारची आमंत्रण पत्रिका शेअर कौल म्हणाल्या की त्यांना लोकशाही आणि घटनात्मक बोलण्यावरून भारतात प्रवेश नाकारण्यात आला. कर्नाटकातील सरकारने मला आमंत्रण दिले होते मात्र भारतातील केंद्र सरकारने माझा प्रवेश रोखला. माझी सगळी कागदपत्रे आणि आताचा ब्रिटनचा पासपोर्ट हे सगळे वैध आहेत. भूतकाळात आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अर्थात आरएसएसवर टीका केली होती त्यामुळेच आपल्याला प्रवेश नाकारण्यात आल्याचे अनौपचारिक संकेत अधिकाऱ्यांनी दिल्याचा दावाही कौल यांनी केला.
भाजपची टीका
कौल यांच्या संदर्भातील घटनाक्रमावर भारतीय जनता पार्टीने टीका केली आहे. त्या भारतविरोधी घटक असून भारत तोडोचा भाग असल्याचे कर्नाटक भाजपने म्हटले आहे. कौल या पाकिस्तान समर्थक असल्याचा आरोप करत त्यांच्या काही लेखांचे शिर्षकही भाजपने शेअर केले आहेत व त्यांना आमंत्रित केल्याबद्दल कर्नाटक सरकारला लक्ष्य केले आहे.
कोण आहेत कौल ?
नितीशा कौल काश्मीरी पंडित आहेत आणि त्या काश्मीरशस संबंधित विषयावर लिखाण आणि भाष्य करत असतात. २०१९ मध्ये जेंव्हा जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम हटवण्यात आले होते त्यावेळी काश्मीरमधील कथित मानवाधिकारांच्या उल्लंघनांच्या बाबत त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार विषयक सभाहृ समितीसमोर साक्ष दिली होती.
याखेरीज त्यांनी द काश्मीर फाइल्स या चित्रपटावरही टीका केली होती. उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे कौल यांचा जन्म झाला असून १९९७ मध्ये त्या लंडनला गेल्या. २००२ नंतर पाच वर्षे त्या ब्रिस्टल बिझनेसे स्कूलमध्ये अर्थशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. त्या आता वेस्टमिंस्टर युनिव्हर्सिटीत असोसिएट प्रोफेसर आहेत व राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी विषय शिकवतात.