पारनेर – कोरोना महामारीमध्ये आमदार नीलेश लंके यांनी शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात 1 हजार 100 बेडची व्यवस्था करीत रुग्णांना आधार देऊन त्यांच्या मनातील भिती दूर करण्याचे महत्वाचे काम केल्याने हजारो कोरोना रुग्णांना जीवदान मिळाले. मनात भिती नसेल तर कोव्हीड होऊ शकत नाही. कोणतेही औषध घेण्याची गरज नाही, हे लंके यांच्या मनस्थितीवरून आमच्या लक्षात आले, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढले.
लाईक माईंडेड एनिशिएटिव्ह फॉर एम्पॉवरमेंट या संस्थेच्या वतीने राजकीय क्षेत्रातील लाईफ स्फूर्ती पुरस्कार आ. नीलेश लंके यांना पुण्यातील नितू मांडके सभागृहात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी पाटील ते बोलत होते.
यावेळी चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्टचे अध्यक्ष सुदामराव गोरखे गुरूजी, आयोजक ओंकार कोंढाळकर, ऍड. भूषण राऊत, आदित्य जोशी, प्रज्वल कोंढरे, प्रद्युम्य राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगर जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, निंबळकचे सरपंच अजय लामखडे, अभयसिंह नांगरे, सुभाष शिंदे, महेंद्र गायकवाड, नुर कुरेशी, अनिल गंधाक्ते, दत्ता ठाणगे, शुभम गलांडे, मनोज शिंदे, विकी लंके, राहुल खामकर, दत्ता होले, तुषार नरसाळे, अभी झावरे उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आ.लंके म्हणाले की, गरजू मतदारसंघातील असो किंवा नसो त्याला मदत करण्याचीच भूमिका घेतली जाते. मतदार संघापुरती मदत करण्याची स्वार्थी भूमिका मी कधीच घेत नाही. निःस्वार्थ भावनेतून काम करतो. दिवसात किमान दहा लोकांना मदत झाली पाहिजे. ही माझी भावना असते. मी वेगळं काही करत नाही. मी माझं कर्तव्य बजावतो. प्रत्येकात मी माझा भाऊ, बहिण, वडील, आई पाहतो.
आम्ही बोलायचेही नाही का ?
जयंत पाटील साहेब व मी शेजारी बसलो. पाऊस पाण्याच्या गप्पा मारत होतो, तेव्हा लगेच छायाचित्रकार फोटो काढू लागले. राजकारण काहीही असो आम्ही बोलायचेही नाही का ? किती बंधने ? मी म्हणतो राजकारणी माणसाला प्रसिद्धी पाहिजे असते, मात्र त्यास मर्यादा असायला हव्यात. जास्त प्रसिद्धी मिळाली की लगेच त्याच्या पाठीमागे कॅमेरामन पळू लागतात, असे लंके यांनी सांगितले.