समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – आठवडाभरापूर्वी तालुक्यावर दुष्काळाचे काळे ढग दाटले होते. मात्र, मागील आठवड्यात श्रीगोंदा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसाने तालुक्याने सरासरी ओलांडली. दुसरीकडे कुकडी प्रकल्पात देखील चांगला पाणीसाठा झाला. परिणामी, दुष्काळजन्य परिस्थितीकडे झुकलेला श्रीगोंदा पाण्याच्या बाबतीत सुस्थितीत आला असून, एका आठवड्यातच हे संपूर्ण चित्र पालटले आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला तालुक्याच्या काही भागात थोडाफार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने जवळपास दोन ते अडीच महिने तालुक्यात दडी मारली. त्यामुळे आता यावर्षी दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कुकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पातील वडज आणि डिंभे ही दोन धरणे ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी वर्गाला काहीसा आधार मिळाला.
तब्बल दोन ते अडीच महिन्यांच्या विश्रांतीनंतर 20 सप्टेंबरपासून तालुक्याच्या बहुतांश भागात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. आठवडाभर तालुक्यात सर्वदूर झालेल्या या पावसामुळे पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठी मदत झाली.
पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरी ना तालुक्यात पाऊस ना कुकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात, यामुळे यावर्षी दुष्काळाचाच सामना करावा लागणार, अशी भीती निर्माण झाली होती. मात्र आठ ते दहा दिवसांपूर्वी एकीकडे तालुक्यात दमदार पाऊस सुरू झाला तर दुसरीकडे तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या कुकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने त्यातील धरणे ओव्हरफ्लो झाली. त्यामुळे आठवडाभरापूर्वी दुष्काळाच्या भीतीने हैराण झालेला श्रीगोंदा तालुका काहीच दिवसांत पाण्याच्या बाबतीत सुस्थितीत आला.
निसर्गाच्या किमयेने आठवड्यातच तालुक्यातील चित्र पूर्णपणे पालटले. त्यामुळे शेतकरी वर्गासह सर्वसामान्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.
कुकडी प्रकल्पातील पाणीसाठा
माणिकडोह – 80 टक्के, येडगाव – 100 टक्के, वडज – 100 टक्के, डिंभे – 100 टक्के, घोड – 100 टक्के, विसापूर – 33 टक्के, चिल्हेवाडी – 94 टक्के.
मंडलनिहाय पावसाची आकडेवारी
श्रीगोंदा – 446 मिमी, काष्टी – 371 मिमी, मांडवगण – 389 मिमी, बेलवंडी – 537 मिमी, पेडगाव – 384 मिमी, चिंभळे – 456 मिमी, देवदैठण – 345 मिमी, कोळगाव – 599 मिमी. सरासरी – 441 मिमी (110 टक्के)