मुंबई – राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने आज धुमाकूळ घातला असून लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. त्यामुळे काही ठिकाणी आंबा आणि द्राक्षे बागांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे अक्कलकोटमध्येही तुफान पाऊस पडला असून बसलेगाव ते गरोळगी या दोन गावाची वाहतूक बंद झाली आहे. (unseasonal rain in maharashtra)
मागील काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात उकाडा वाढला होता. शनिवारी दुपारपासूनच जिल्ह्यात ढग दाटून आले होते. मागील एक तासापासून लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. जोरदार वाऱ्यासह विजेचा गडगडात सुरू होता. यातच तुफान पावसाने सुरुवात केल्याने जनजीवन विस्कळीत झाला आहे.
जोरदार वारं आणि विजेचा गडगडात याचा थेट परिणाम थेट पिकांवर होताना दिसत आहे. ज्वारी पिकाचे नुकसान अधिक प्रमाणात झाले आहे. किल्लारी भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बाग आहे. जोरदार वारा आणि पावसामुळे द्राक्षांच्या बागेवर परिणाम होताना दिसत आहे. या पावसाने केशर आंब्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. अवकाळी पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील बसलेगाव ते गरोळगी या दोन गावाची वाहतूक बंद झाली आहे. महामार्गावर पाणीच पाणी झाले. तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली.
दरम्यान, राज्यातील कमाल आणि किमान तापमानात देखील मोठी वाढ झाली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमधील तापमान ४३ अंशांपर्यंच पोहोचले आहे. उत्तर कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
नुकसानीच्या क्षेत्रात वाढ –
काही दिवसापूर्वी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी 200 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर अवकाळी पावसाचा फटका बसला होता. अवकाळी पावसाच्या नुकसानीचे माहिती घेण्याचे काम प्रशासनाचे सुरू आहे. त्यातच आजचा पाऊस हा अतिप्रचंड असल्याने नुकसानीचे क्षेत्रात आता वाढ होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्याने प्रशासन या नुकसानीचा अंदाज आणि माहिती घेण्यात किती तत्परता दाखवते हे पाहावे लागेल.