- मारुती जैनक
हे वर्ष भारतभूसाठी विशेष आहे. त्याचं कारण म्हणजे यंदा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. या पार्श्वभूमीवर देशभर विविध उपक्रम-कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अर्थातच हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी देशाचा कानाकोपरा सज्ज झालाय. अमृत महोत्सवी स्वातंत्र्यत्सोव घराघरांत साजरा व्हावा, यासाठी केंद्र सरकारने “हर घर तिरंगा’ हा उपक्रम हाती घेतलाय. मनामनांत जाज्वल्य देशाभिमान जागृत व्हावा, तो हृदयस्थ व्हावा हेच या उपक्रमामागचे प्रयोजन. खचितच हा उपक्रम स्वागतार्ह आहे.
अर्थकारण अन् देशभक्ती
स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन दरवर्षीच साजरे केले जातात. नाही म्हटलं तरी ते मर्यादित स्तरावरच साजरे होतात. शाळा-महाविद्यालये, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणीच त्याचं साजरं होणं असतं. या अस्थापनांमध्ये ध्वजवंदन करुन देशाप्रती आदरभाव व्यक्त केला जातो. यंदा मात्र हा देशोत्सव घराघरांत साजरा होत आहे. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्याला नक्कीच वेगळे महत्त्व आहे. हा उत्सव घराघरांत साजरा होणार असल्याने ध्वजनिर्मितीही तेवढ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. त्यादृष्टिने सरकारी यंत्रणांबरोबरच खासगी उद्योगांनीही पावले उचलली आहेत. सध्या देशभर लगबग सुरू आहे ती ध्वजनिर्मितीची. यातून काही अंशी का होईना अर्थकारणाबरोबरच देशभावही वृद्धींगत होणार आहे.
पुणेही आघाडीवर
सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. कोणताही सण असो की, उत्सव पुणेकर त्यात समरसून जातात. उत्सवात झोकून देऊन “अवघाची रंग एक झाला’ची पुणेकरांतील भावखुबी यातून दिसून येते. अर्थातच देशभर हा उत्सव साजरा होत असताना उत्सवप्रिय पुण्यनगरीकर यात मागे कसे असणार? सांगायचे तात्पर्य हेच की, पुणेकरांनी देखील या उत्सवाची जय्यत तयारी सुरू केलीय. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषद या तिन्ही संस्थांनी “हर घर तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी काटेकोर नियोजन केले आहे. घराघरांत तिरंगा पोहचावा, यासाठी या तिन्ही संस्थांनी सर्वोतोपरी तयारी केली आहे. यासाठी लाखोंच्या संख्येने राष्ट्रध्वजाची छपाई केली जात आहे. ध्वजनिर्मितीबरोबरच वितरण व्यवस्थाही उभारण्यात आली आहे. टपाल खातेही या उपक्रमात आघाडीवर आहे. या खात्याने राष्ट्रध्वजाची ऑनलाइन विक्रीही सुरू केली आहे. शहर-जिल्ह्यातील प्रत्येक पोस्ट कार्यालयात ध्वजविक्री आणि वितरणाची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. या सर्व यंत्रणांच्या पुढाकारातून जिल्ह्यात 21 लाखांवर घरात तिरंगा फडकणार आहे. स्वातंत्र्यत्सोवाचा आनंद द्विगुणित होणार आहे.
आनंद लुटू…भान राखू!
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा खऱ्या अर्थाने अमृतानुभवच आहे. या अमृतानुभवाचे साक्षीदार होताना प्रत्येकाने भानही राखले पाहिजे. तिरंगा म्हणजे केवळ रंगीत कापड नसून, मातृभूमीची शान आहे. हरेक भारतीयाची मान आहे. हे भान ठेवायलाच हवे. केवळ सार्वजनिक ठिकाणीच नव्हे, तर घरातही ध्वजवंदन करताना काही चुकीचं घडणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. ध्वजवंदन करताना ज्या मानकांचं पालन होणं गरजेचं आहे, ती पाळलीच पाहिजेत. नव्हे, तो आपला कर्तव्यधर्मच आहे. हा धर्म जसा देशाभिमानाची स्फुलिंगे चेतवणारा अग्नी आहे, तसाच तो संस्कारबीजांचा पेरताही आहे, हे लक्षात घ्यायला हवे. ध्वज जमिनीवर पडणे, चुरघळणे, उलट्या पद्धतीने फडकवणे असे प्रकार चुकूनही घडू नयेत, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यायला हवी. तरच ध्वजाचा मान राखला जाईल. त्यातूनच लहान मुलांच्या मनातही “संस्काराचा ध्वज’ लहरत राहील.
सामाजिक संस्थांचे दायित्व
दरवर्षी स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिनी कागदी राष्ट्रध्वजाची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते. रस्त्या-रस्त्यांवर, शाळा परिसरात विक्रेते दिसतात. लहान मुले कौतुकाने हे ध्वज मिरवतात; पण हा दिवस संपला की, त्याचे कौतुकही संपते. आपसूकच मग हे ध्वज इतस्तः पडतात. हे नकळत घडत असले तरी तो एका अर्थानं राष्ट्रध्वजाचा अवमानच नाही का! लहानांचं सोडा; पण मोठ्यांनाही याचं भान नसावं, हे आर्श्चयच म्हणावं लागेल. राष्ट्रध्वजाचा हा अवमान टाळण्यासाठी काही सामाजिक संस्था दरवर्षी पुढे येतात. रस्त्यावर-केरकुंडीत पडलेले ध्वज ते सन्मानपूर्वक गोळा करतात. त्यांची ते योग्य पद्धतीने विल्हेवाट लावतात. यंदा तर “हर घर तिरंगा’मुळे ध्वजांची संख्या प्रचंड असणार आहे. त्यामुळे या संस्थांचा कार्यभागही वाढणार आहे. त्यादृष्टिने पावले उचलून संस्थांना आपले दायित्व पार पाडावे लागणार आहे. लोकांनीही पुढे येऊन संस्थांना मदत करायला हवी. ध्वज इतस्ततः न टाकता ते या संस्थांकडे संकलित करायला हवेत. ध्वजदानाचे हे पवित्र कार्य देखील राष्ट्रभक्तीच नव्हे का!