मुंबई – राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मात्र आपल्याला मंत्रिपद मिळणार अशी रोजच वाट पाहणारे आमदार संजय शिरसाठ, भरत गोगावले आणि बच्चू कडूंची इच्छा कधी पूर्ण होणार याकडे लक्ष लागले आहे. आजच्या खातेवाटपातही त्यांच्या पदरी निराशा आली आहे.
महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रवेश केल्यामुळे गेल्या वर्षभरापासून आपण मंत्री होणार अशी आशा लावून बसलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना मंत्रीपदाला मुकावे लागले आहे. अजित पवार सत्तेत आल्यामुळे सरकार अधिक भक्कम झाले असले तरी त्यामुळे शिंदे गटामध्ये काहीशी अस्वस्थता दिसून येत आहे. खातेवाटपानंतर भाजप शिंदे गटापेक्षा अजित पवार गटावरच जास्त मेहेरबान असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, संजय शिरसाठ, भरत गोगावले, बच्चू कडू यांसह शिंदे गटाचे अनेक आमदार घोड्यावर बसून आहेत, आपण उद्याच मंत्री होणार असा दावा त्यांच्याकडून रोजच करण्यात येत होता. त्यामध्ये सर्वात पुढे नाव होते भरत गोगावले, संजय शिरसाठ आणि बच्चू कडू यांचे. भरत गोगावले आणि संजय शिरसाठ यांनी तर आपण पालकमंत्रीही होणार असल्याचे म्हंटले होते. पण त्यांच्या पदरी कायम निराशाच आली आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सत्तेत सामील होत नऊ कॅबिनेट मंत्रीपदे पदरात पाडून घेतली. राष्ट्रवादीच्या गटाला मिळालेली अर्थ, सहकार, कृषी खाती महत्वाची आहे. भाजपकडील अर्थ खाते हे अजित पवारांकडे गेले, सहकार खाते हे दिलीप वळसे पाटलांकडे गेले आहे आणि शिवसेना शिंदे गटाकडील अब्दुल सत्तार यांच्याकडे असलेले कृषी खाते आता राष्ट्रवादी गटाचे धनंजय मुंडे यांच्याकडे गेले आहे. शिंदे गटातील नेत्यांना पुढील मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.