मुंबई – महाराष्ट्रात विभिन्न राजकीय तत्वज्ञान असणारे पक्ष महाविकास आघाडीच्या बॅनरखाली एकत्र आले आहेत आणि त्यांनी उत्तम सरकार चालवले आहे. असाच प्रयोग केंद्रीय पातळीवर युपीए आघाडीने राबवला पाहिजे असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे एक आयडियल सरकार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या प्रयोगातून महाराष्ट्राने भाजप विरोधी राजकीय पक्षांना एक नवीन मार्ग दाखवला आहे. तीन विभीन्न विचारसरणीच्या राजकीय पक्षांनी राज्यात गेले दीड वर्ष एक उत्तम सरकार चालवून दाखवले आहे हाच प्रयोंग आता सर्व भाजप विरोधी राजकीय पक्षांनी दिल्लीत राष्ट्रीय पातळीवर करायला हवा असे राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या विरोधातील 27 राजकीय पक्षांना जे पत्र पाठवले आहे त्यात हीच भूमिका मांडण्यात आली आहे असे त्यांनी पत्रकारांच्या निदर्शनाला आणून दिले. 1975 साली जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली असाच प्रयोग झाला होता. पण आज जयप्रकाश नारायण यांच्या तोडीचा नेता नाही हीच खंत आहे असे त्यांनी म्हटले आहे.