मुंबई – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. त्या नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.
मी राज्य सरकारच्या वतीने त्यांचे आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेले माजी न्यायमूर्ती आणि मंत्र्यांचेही देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर फडणवीस यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने मनोज जरांगे यांना फोनही गेला होता.
त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस मी देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर काही दिवसांतच उपोषण मागे घेण्यात आले आहे. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, तसे झाले नाही.
दरम्यान आता आंदोलनादरम्यान यातून मार्ग काढण्यात आला असून सरकारला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे सध्यातरी हा मुद्दा मागे पडला असल्याचे दिसून येत आहे. मनोज जरांगे यांनी सरकारच्या विनंतीला मान देऊन उपोषण मागे घेतल्याने त्यांचे आभार मानण्यात आले.