मुंबई – आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर ही स्पर्धा आता या वर्षी होणारच नाही असे संकेत बुधवारी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले होते, आज त्याचे समर्थन करताना त्यांनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच पुढील स्पर्धांबाबत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
देशवासियांचा जीव, त्याचे आरोग्य कोणत्याही स्पर्धेपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. सध्या भारतातच नव्हे तर जगभरातील स्पर्धा एकतर रद्द झाल्या आहेत, किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. भारतात लॉकडाऊन असल्याने व करोनाचा धोका कायम राहिल्याचे दिसत असताना सध्या कोणत्याही स्पर्धेच्या भवितव्याबाबत विचार करणेदेखील शक्य नाही. त्यामुळे पुढील महिनाभरात सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच त्याबाबत बोलणे योग्य ठरेल, असेही गांगुली यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या धोक्यामुळे जागतिक क्रीडा स्पर्धांना चांगलाच फटका बसलेला आहे. अनेक ठिकाणी प्रेक्षकांना प्रवेश नाकारुन काही सामने खेळविण्यात आले होते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात मार्च महिन्यात झालेला पहिला एकदिवसीय सामनाही रिकाम्या मैदानावर खेळविण्यात आला होता. मात्र, त्यावेळी करोनाचा प्रसार फारसा वाढला नव्हता.