मंचर- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर आम्ही गेले अनेक वर्ष काम केले असून, गेल्या पाच-सहा वर्षांत त्यांची भूमिका तळ्यात मळ्यात असल्याने अजित पवार यांनी मळ्यात राहण्याचा विचार केला व आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झालो, आम्ही पवार साहेबांना सोडून गेलो याबाबत सगळेजण आश्चर्य व्यक्त करीत आहेत; पण पक्षाच्या बैठकीत ते वेगळे बोलायचे व बाहेर दुसरी चर्चा करायचे हे आम्हाला पटत नसायचे, त्यामुळे अजित पवार यांनी याबाबत सर्व उलगडा करून सरकारमध्ये जाण्याची भूमिका घेतली, असे वक्तव्य कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथे सोमवार (दि. 10) कृषी उत्पन्न बाजार समिती येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नाशिक येथून पुणे येथे जाताना आंबेगाव तालुका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी काही वेळ कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे आले होते. यावेळी त्यांचे ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. बाजार समिती येथील दत्त मंदिर येथे देवदर्शन घेतले.
त्यावेळी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शरद बॅंकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकरचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, संचालक लक्ष्मण बाणखेले, राजेंद्र भंडारी, बाळासाहेब रंगनाथ बाणखेले, ज्ञानेश्वर घोडेकर, सोपान नवले, नीलेश थोरात, आनंदराव शिंदे, अरविंद वळसे पाटील, दिलीप लोखंडे, रमेश खिलारी,दौलतराव लोखंडे, बाळासाहेब थोरात, सखाराम घोडेकर, ज्ञानेश्वर अस्वारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, आम्ही पवार साहेबांना सोडून गेलो याबाबत सगळेजण आश्चर्य व्यक्त करीत आहेत. मात्र गेल्या पाच-सहा वर्षांत पवार साहेबांची भूमिका तळ्यात मळ्यात असायची. पक्षाच्या बैठकीत वेगळे बोलायचे व बाहेर दुसरी चर्चा करायचे हे आम्हाला पटत नसायचे, त्यामुळे अजित पवार यांनी याबाबत सर्व उलगडा करून सरकारमध्ये जाण्याची भूमिका घेतली व त्यांच्याबरोबर आम्ही सरकारमध्ये सामील झालो.
वळसे पाटील अभ्यासू नेतृत्व
आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील हे आमच्याबरोबर आले असून , ते अतिशय शांत, प्रभावी, अभ्यासू व जनतेसाठी काम करणारे नेतृत्व आहे. पुढील काळात आम्ही सर्वजण मिळून जनतेचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे मंत्री भुजबळ यावेळी म्हणाले.