मुंबई – राज्यातील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख ‘उद्धव ठाकरे’ दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आज त्यांनी अमरावतीत जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारला आणि भाजपाला थेट आव्हान देत त्यांच्यावर सडकून टीका केली. तसेच, त्यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर देखील जोरदार टीका केल्याचं दिसून आलं आहे.
आज अमरावतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी “आज तुमच्याकडे खोकेच्या खोके पडले आहेत. तुम्ही आमदार विकत घेताय असं मी ऐकतोय. पण त्याच पैशातून माणसं वाचवा ना. माणसं वाचवली तर तुम्हाला कोणाला विकत घेण्याची गरजच लागणार नाही. मतंसुद्धा विकत घ्यावी लागणार नाही.’ अशी टीका केली.
पुढे बोलताना त्यांनी, “पण कामच करायचं नाही. नुसतं हे फोड ते फोड करायचं. मी तर घरी बसलो होतो, तरी सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून माझं नाव येत होतं. तसं संपूर्ण जगामध्ये नंबर एकचे पंतप्रधान आपल्या देशाचे पंतप्रधान असतानाही तुम्हाला अजूनही इतर पक्ष फोडण्याची गरज का वाटते?’ असा सवाल यावेळी केला.
दरम्यान, आता उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आमदार रवी राणा यांनी त्यावर आता पलटवार केला आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ देखील त्यांचा समोर आला आहे. रवी राणा यांनी उद्धव ठाकरे हे चार वर्षानंतर पहिल्यांदा अमरावतीमध्ये पाव ठेवत आहेत. मला असा वाटतं मुख्यमंत्री असताना जो माणूस काही करू शकला नाही, जो मातोश्रीवर लपून बसला, अमरावतीमध्ये जेव्हा बाळासाहेबांचे सच्चे शिवसौनिकांना बेड मिळत नव्हता, त्यांना औषध मिळत नव्हतं. त्यावेळी उद्धव ठाकरे फोन सुद्धा उचलत न्हवते.
तेव्हा त्यांना शिवसैनिकांच्या आठवण आली नाही. मग आता चार वर्षानंतर त्यांना अमरावती आणि शिवसैनिकांची कशी आठवण आली. आता कसे ते बाहेर पडले? हनुमान चालीसा प्रकरणात एक महिला खासदाराला आणि आमदाराला घरामध्ये अटक केली. त्यामुळे नामर्द मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची ओळख तेव्हा निर्माण झाल्याची टीका रवी राणा यांनी केली आहे.