नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे आम आदमी पक्षापुढे (आप) नेतृत्वाचा पेच उभा राहणार आहे. त्याशिवाय, दिल्ली सरकारचे कामकाजही प्रभावित होण्याची शक्यता आहे. सरकार आणि पक्षाचे प्रमुख अशी दुहेरी जबाबदारी केजरीवाल यांच्या खांद्यांवर होती. त्यांच्या अटकेमुळे दोन्ही ठिकाणी मोठी पोकळी जाणवणार आहे. (Aam Aadmi Party leadership)
केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत सरकार आणि पक्षाचे कामकाज प्रभावीपणे चालणार का, असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून विस्तारासाठी आप सज्ज झाला. मात्र, ऐन निवडणूक काळातच केजरीवाल यांना अटक झाली. ती घडामोड आपच्या दृष्टीने प्रचंड हादरा ठरली आहे. मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, संजय सिंह यांसारखे पक्षाचे महत्वाचे नेते आधीपासूनच अटकेत आहेत. आता प्रमुख आधार असणाऱ्या केजरीवाल यांची अनुपस्थिती आपची मोठी कोंडी करणारी ठरणारी आहे.
आपचे मुख्य स्टार प्रचारक म्हणून अर्थातच केजरीवाल यांच्याकडे पाहिले जाते. साहजिकच, ते प्रत्यक्ष मैदानात नसले तर आपची प्रचार मोहीम प्रभावहीन ठरण्याची चिन्हे आहेत. त्यातून आपच्या निवडणुकीतील कामगिरीवर प्रतिकूल परिणाम होण्याचीही शक्यता आहे. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीसाठीही केजरीवाल महत्वाचे स्टार प्रचारक ठरू शकतात. त्यामुळे त्यांची अटक त्या आघाडीसाठीही धक्का मानली जात आहे.