नवी दिल्ली – लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये नियमीत स्वरूपाच्या भरतीमुळे संरक्षण दलांवर वेतन आणि पेन्शनचा मोठा भार पडतो. हा पैसा वाचवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने लष्कर भरतीची नवी अग्निपथ योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्या अंतर्गत युवकांना चार वर्षांसाठी लष्करात काम करण्याची संधी मिळणार आहे.
अल्पमुदतीच्या करारावर या युवकांना लष्करात काम करण्याची संधी मिळेल. त्यातून त्यांना रोजगारही मिळेल आणि लष्कराला आवश्यक ते मनुष्यबळही उपलब्ध होईल अशी ही योजना आहे. या योजनेच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने मान्यता दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषदेत नवीन योजनेची घोषणा केली.
राजनाथ सिंह म्हणाले, अग्निपथ भरती योजना हा एक परिवर्तनकारी उपक्रम आहे जो सशस्त्र दलांना तरुण मनुष्यबळ उपलब्ध करेल. भरती प्रक्रियेतील क्रांतिकारक बदलांमुळे सुरुवातीला युवकांना चार वर्षांच्या कालावधीसाठी लष्करात समाविष्ट केले जाईल आणि त्यानंतर त्यांच्यातील काहींना त्यांच्या योग्यतेनुसार लष्करात कायम स्वरूपी नोकरीही मिळू शकेल.
सध्या लष्कराच्या निवृत्त सैनिकांच्या निवृत्तीवेतनावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. त्या खर्चात बचत करण्यासाठी ही नवी योजना सुरू करण्यात येत आहे असे सांगितले जाते. चालू वर्षाच्या लष्करी अंदाज पत्रकात 5 लाख 25 हजार 166 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे, पण यातील 1 लाख 19 हजार 696 कोटी रूपये केवळ निवृत्तीवेतनावर खर्च होत आहेत.
नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार म्हणाले की, सशस्त्र दलांमध्ये या योजनेतून अनेक सक्षम युवक सहभागी होऊ शकतील. यातून महिलांनाही मोठ्या प्रमाणात संधी मिळू शकेल. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले की, या योजनेचा उद्देश सशस्त्र दलातील भरतीमध्ये बदल घडवून आणण्याचा आहे. सध्याच्या प्रचलीत पद्धतीत जवानांचा दहा वर्षासाठी समावेश केला जातो आणि त्यांच्या नोकरीचा कालावधी 14 वर्षांपर्यंत वाढवता येतो. पण आता चार वर्षांच्या कंत्राटी भरतीची प्रक्रिया लष्करात राबवली जाणार आहे.