अकोले – केंद्र सरकार दूध परदेशातून आयात करीत आहे. त्यामुळे दूधाला भाव नाही, अशा अफवा विरोधक पसरवित आहे. उलट केंद्र सरकारने दूध निर्यातीचे धोरण घेतले आहे. जगात भारत देश दूध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये अमूल दूध एक नंबरवर असून त्याप्रमाणे अमृतसागरने एक नंबर येण्यासाठी काम करावे. दूध धंद्यातील खासगी व व्यापारीकरण रोखले पाहिजे, दूध उत्पादकांनी जास्तीत जास्त दूध सहकारी संघाला घालावे, असे आवाहन माजीमंत्री मधुकर पिचड यांनी केले.
अक्षय तृतीया व रमजान ईद या मुहूर्तावर अगस्ती मिल्क पार्लरचे उद्घाटन पिचड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अमृतसागर दूध संघाचे अध्यक्ष माजी आमदार वैभवराव पिचड होते. यावेळी हेमलताताई पिचड, संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, संचालक आनंदराव वाकचौरे, आप्पासाहेब आवारी, रामदास आंबरे, जगन देशमुख, अरुण गायकर, बबन चौधरी, गंगाधर नाईकवाडी, सुभाष डोंगरे, बाबुराव बेणके, गोरक्ष मालुंजकर, शरद चौधरी, अश्विनी धुमाळ, सुलोचना औटी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे उपस्थित होते.
यावेळी वैभवराव पिचड म्हणाले की, स्पर्धेच्या काळात अगस्ती मिल्क पार्लर सुरू करून ग्राहकांना चांगली दूध उत्पादने व सेवा देण्याचा आमचा मानस आहे. अमृतसागर दूध संघ हा तालुक्यापुरता मर्यादित न ठेवता त्याचा विस्तार जिल्ह्यात करायचा आहे. पशुधन टिकवण्यासाठी व वाढविण्यासाठी पशुखाद्य निर्मिती प्रकल्प लवकरच हाती घेणार आहे. अकोले खरेदी विक्री संघ आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला तो उर्जित अवस्थेत आणणार आहे. तालुक्यात अतिरिक्त दूध असल्याने दूध उत्पादकाना चांगला भाव मिळावा या दृष्टीने अमृतसागरच्या स्वतःच्या मालकीचा दूध पावडर प्रकल्प सुरू करणार आहोत.
काटकसरीने कारभार, दुधाला चांगला भाव देणे व दुध उत्पादकांना जास्तीत जास्त रिबेट देणे या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत. याच पद्धतीने खरेदी विक्री संघ व कृषी बाजार समिती आमच्या ताब्यात दिल्यास आम्ही त्याला उर्जितावस्था आणून प्रगती करू असे मत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक संचालक आप्पासाहेब आवारी यांनी केले. सूत्रसंचालन बाळशीराम तळेकर यांनी केले तर आभार संचालक रामदास आंबरे यांनी मानले.