ओझर – जागतिक बाजारपेठेत साखरेला चांगले दर आहेत; परंतु केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंदी घातली. जागतिक बाजारात 50 रुपये पेक्षा जादा दर आहेत. निर्यात बंदी असलेने त्याचा फायदा कारखान्यांना घेता येत नाही. देशांतर्गत बाजारपेठेत आता साखरेला बाजारभाव चांगले आहेत. पण आता कोणत्याही कारखान्याकडे जास्त साखरसाठा शिल्लक नाही, असे विघ्नहर सहकारी साखर कारखान्यचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले.
सकल मराठा समाज समन्वयक व शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा देत अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप आणि सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या 38 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवारी (दि. 1) निवृत्तीनगर (ता. जुन्नर) येथे साध्या पद्धतीने पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कार्यकारी संचालक भास्कर घुले आणि सर्व संचालक मंडळ, सकल मराठा समाज समन्वयक पदाधिकारी आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, सभासद ऊस उत्पादक तसेच विघ्नहर कारखान्याचे अधिकारी व कामगार उपस्थित होते. दरम्यान, नियोजित डिस्टीलरी विस्तारीकरण प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ पुढे ढकलण्यात आला असल्याचे शेरकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अरुण थोरवे यांनी तर उपाध्यक्ष अशोक घोलप यांनी आभार मानले.
साखरेचे, इथेनॉलचे दर चांगले राहतील
साखरेचे व इथेनॉलचे दर पुढील वर्षीही चांगले राहण्याची शक्यता आहे. यावर्षी तसेच पुढील वर्षीही ऊसाची लागवड वाढविल्यास उसाला चांगला बाजारभाव मिळेल. इतर शेतीमालाचे अनिश्चित असलेले बाजारभाव लक्षात घेता उसाला हक्काचा बाजारभाव मिळतो. तेव्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उसाची लागवड करावी, असे आवाहन सत्यशील शेरकर यांनी केले.
सत्यशील शेरकर
- “विघ्नहर’च्या गळीत हंगामाचा शुभारंभ
- जागतिक बाजारात साखरेला 50 रुपयांचा दर
- कोणत्याही कारखान्याकडे जास्त साखरसाठा नाही
- बाजारभाव लक्षात घेता जादा ऊस लागवड करा
अशी यंत्रणा उभारली
गाळप हंगाम 2023-24 साठी आपण सुमारे 10 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून त्याकरीता टायर बैलगाडी 798, ट्रॅक्टर टायरगाडी 380, गाडीसेंटर 162 टोळी, डोकेसेंटर 73 टोळी, ऊस तोडणी यंत्र (हार्वेस्टर) 10 याप्रमाणे ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उभारण्यात आली आहे. तसेच लगेचच प्रत्यक्ष गाळपास सुरुवात केली असल्याचे सत्यशील शेरकर यांनी सांगितले.
“ऊस उत्पादक शेतकरी वर्गाबरोबरच सकल मराठा समाजाचे समन्वयक आणि शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांचे विघ्नहर कारखान्यास नेहमीच सहकार्य असते. त्याचबरोबर यंदाच्या हंगामात कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त ऊस गाळप करणार आहे.” – भास्कार घुले, कार्यकारी संचालक, विघ्नहर कारखाना