राजगुरूनगर (प्रतिनिधी): निसर्ग वादळाचा जिल्ह्यात सर्वाधिक फटका खेड तालुक्याला बसला आहे. या वादळात वहागाव ता खेड येथे तानाजी नवले व नारायण नवले यांच्या घराचे पत्रे उडून चार जण जखमी झाले. मंजाबाई अनंता नवले वय 65 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
वांजळे ता खेड येथील विजेच्या खांबावरील तार तुटून पडल्याने एक म्हैस ठार झाली तर तिच्या मालकिनीला विजेचा झटका बसल्याने किरकोळ जखमी झाल्या आहेत. तालुक्यात सर्वाधिक घरांचे पत्रे छत उडून नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक इंदिरा आवास, शबरी घरकुल व रमाई घरकुल योजनेंतील घरे असून अंगणवाड्या, शाळा यांच्या इमारतीचे निसर्ग वादळाने मोठे नुकसान केले आहे.
खेड तालुक्यात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निसर्ग वादळ दाखल झाले त्याची तीव्रता हळूहळू वाढत गेली. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये विजेचे खांब पडले. अनेक गावांमध्ये असलेली छोटी मोठी झाडे जमीनदोस्त झाली. वादळात झाडे पडल्याने अनेक रस्ते काही काळ बंद झाले होते. स्थानिकाच्या मदतीने रस्त्यातील झाडे, विजेच्या तारा बाजूला करून रस्ते मोकळे करण्यात आले.
खेड तालुक्यातील वहागाव येथे घराचे पत्रे उडून व भिंत पडल्याने चार जण जखमी झाले. यात एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. उर्वरित जखमींवर चाकण येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वीज वाहक तारा तुटल्या आहेत तर अनेक गावांमध्ये वीज पुरवठा करणारे विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने अनेक गावे अंधार आहेत. मोबाईल नेटवर्क नसल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.
तालुक्यातील निसर्ग वादळाने अनेक गावांत नुकसान झाल्याची घटना घडल्यानंतर पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर गटविकास अधिकारी अजय जोशी, पस सभापती अंकुश राक्षे, तहसीलदार सुचित्रा आमले, महसूल अधिकारी, पस चे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी ग्रामसेवक, तलाठी यांच्या माध्यमातून परिस्थितीचा आढावा घेतला. आवश्यक तेथे प्रशासनाकडून मदत सुरू करण्यात आली आहे. दरम्यान रात्री सात नंतर पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यात आज सकाळी पासून तुरळक पाऊस आणि हलकेसे वादळ सुरू झाले दुपारी बारानंतर त्यात वाढ होत गेली आणि निसर्ग वादळाची तीव्रता वाढली. पावसाचे प्रमाणही वाढत गेले. सोसाट्याचा वारा सुटला. वाऱ्याची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे होती ती दुपारी चार नंतर उत्तर दक्षिण झाली. निसर्ग चक्रीवादळ झाल्याने तालुक्यातील अनेक नागरिकांच्या घराचे मोठे नुकसान झाले. शेतातील उन्हाळी पिके भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.झालेल्या नुकसानीचे शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान ग्रस्त नागरिकांना भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.