पुणे – राष्ट्रीय पेयजल योजनेच्या नावात आता बदल करण्यात आला असून, “जल जीवन मिशन’ असे नाव करण्यात आले आहे. या योजनेसाठी ग्रामपंचायत स्तरावर सर्वेक्षण सध्या सुरू असून त्यानंतर गावामध्ये नळ योजनेसंदर्भात अहवाल तयार करण्यात येणार आहे.
योजनेच्या नावात बदल केल्यानंतर प्रतिव्यक्ती पंधरा लिटर पाणी वाढवून देण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे ग्रामीण भागात 40 ऐवजी 55 लिटर पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या सर्वेक्षण करणे आवश्यक होते. घरोघरी जाऊन नळ कनेक्शन आहे किंवा नाही याची माहिती गोळा करण्यात येणार आहे. जर पाण्याचे नळ कनेक्शन नसेल तर त्यांना विस्तारकरणामध्ये नळजोडणी देण्यात येणार आहे. संपूर्ण गावामध्येच जर नळयोजना राबविली नसल्यास, त्यांना योजना देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार केला जाणार आहे.
शहराच्या बरोबरीने सर्व सुविधा आता ग्रामीण भागामध्ये उपलब्ध होऊ लागल्या आहेत. नागरीकरणाच्या प्रभावामुळे ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान देखील उंचावले आहे. त्यामुळे दरडोई पाण्याच्या वापरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी हे नळाद्वारे देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी गावोगावच्या नळयोजना पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना फायदा होणार आहे.