मुंबई – टाटा मोटर्सने सर्वात कमी किमतीची नॅनो कार काही वर्षांपूर्वी भारतात सादर केली होती. मात्र या कारची विक्री होण्यात बरेच अडथळे आले. दरम्यानच्या काळात एप्रिल 2020 मध्ये भारत सरकारने बीएस -6 हे नवे उत्सर्जन नियम आणले.
अशा परिस्थितीत या कारचे उत्पादन करणे चालू ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे टाटा मोटर्सने या कारचे उत्पादन मे 2018 ला थांबविले होते. मात्र आता बऱ्याच माध्यमांनी टाटा मोटर्स नॅनो कार इलेक्ट्रिक स्वरूपात सादर करण्याच्या शक्यतेवर विचार करीत असल्याचे वृत्त दिले आहे.
अगोदर नॅनो कार गुजरात मध्ये सानंद येथे तयार करण्यात येत होती. मात्र आता तेथे इतर कारचे उत्पादन सुरू आहे. त्यामुळे आता जर इलेक्ट्रिक नॅनो सुरू करायची असेल तर नवा प्रकल्प सुरू करावा लागणार आहे. यासाठी टाटा मोटर्स तामिळनाडूमध्ये फोर्ड परिसर मिळविण्याबाबत तामिळनाडू सरकारशी चर्चा करीत असल्याचे वृत्त आहे.
मात्र टाटा मोटर्स कडून यासंदर्भात औपचारिक आणि अधिकृत पातळीवर कसलेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. काही माध्यमे सूत्राचा हवाला देऊन या संदर्भात माहिती देत आहेत. सध्या टाटा मोटर्स तीन इलेक्ट्रिक कार भारतात तयार करीत आहे. या कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे