मुंबई – नागपूर आणि अमरावतीची निवडणूक जिंकण्यासाठी कॉंग्रेसमध्ये वाद असल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले. कॉंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी अगोदरच सांगितले होते, की आमच्यात कोणताही वाद नाही. बाळासाहेब थोरात यांनीदेखील नाराज नसल्याचे सांगितले होते. वाद निर्माण करण्याचा प्रयत्न फोल ठरलेला आहे. त्यामुळे कसबा आणि चिंचवड जागा आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिंकू, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले. ( nana patole balasaheb thorat news )
मुंबईत कॉंग्रेस कार्यकारिणीची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी कॉंग्रेस पक्षाची भूमिका मांडत भाजपवर निशाणा साधला. या बैठकीस बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कॉंग्रेसचे नेते उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले, कॉंग्रेस हा एकसंघ पक्ष आहे. कॉंग्रेसमध्ये कुठेही वाद नाही. आम्ही सर्व एक आहोत, असा संदेश मी सातत्याने देत होतो. परंतु नागपूर आणि अमरावतीच्या निवडणुका हरल्यानंतर ज्यापद्धतीने भाजपाच्या वतीने एक वातावरण कॉंग्रेसबद्दल निर्माण करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. कॉंग्रेसमध्ये विभाजन आहे, अशा पद्धतीचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात उभारण्यात आले होते, असे नाना पटोले म्हणाले.
तसेच कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा संकल्प या बैठकीत झाला आहे. एकजुटीने आमची पूर्ण कार्यकारिणी या दोन्ही विधानसभेत जाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा प्रचार करणार आहेत. काही ठरावही आम्ही त्यामध्ये केले आहेत.
केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर ( nana patole balasaheb thorat news )
बीबीसीच्या संस्थेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक चित्रफीत तयार करण्यात आली होती. जे वास्तविक आहे, ते जगभरात दाखवले जात आहे. परंतु देशभरात दाखवले जाऊ नये, यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. मोदींकडून ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग यांसारख्या यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे या पद्धतीची हुकुमशाही सहन केली जाणार नाही, असे पटोले म्हणाले.