मुंबई – नुकतंच प्रदर्शित झालेला विवेक रंजन अग्निहोत्रीच्या ‘द कश्मीर फाईल्स’ची सध्या खूप चर्चा सुरू आहे. हा सिनेमा 1989 आणि 1990 च्या काळातील काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा आहे. काश्मिरी पंडितांनी भोगलेल्या वेदना, दुःख आणि संघर्षावर प्रकाश टाकण्याचे काम या सिनेमातून झाले आहे. सध्या सोशल मीडियावर या सिनेमाला नेटकऱ्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळत असून, अनेकांना सिनेमा पाहून रडू कोसळल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हा सिनेमा आवडला असून त्यांनी या सिनेमाच्या टीमची भेट घेतली. आणि सिनेमा सर्वांनी आवर्जून पाहावा असं सुद्धा सांगितलं आहे. सध्या सर्वच ठिकाणी या सिनेमाची चर्चा होताना दिसून येत आहे. आणि याच पार्श्ववभूमीवर जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी चित्रपट आणि चित्रपटाबद्दल होणाऱ्या वादावर आपली भूमिका मांडली आहे.
एका कार्यक्रमात नाना म्हणाले की…, ‘हा चित्रपट मी पाहिलेला नाही. त्यामुळे मला त्याबद्दल सविस्तर बोलता येणार नाही. तो पाहिला असता तर मला सांगता आलं असतं. पण एखाद्या चित्रपटाबद्दल असा वाद होणं बरोबर नाही. मला वाटतं की इथले हिंदू आणि इथले मुसलमान हे इथलेच आहेत. त्यांनी एकत्र राहाणं गरजेचं आहे. त्यांनी एकत्रच राहावं. गट होत असतील तर ते चुकीचं आहे.’ असं मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं.