मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुर्णाजवळ एसयूव्ही कार आणि वेगवान ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात महाराष्ट्रातील नागपूर येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व राजस्थानमधील भिलवाडा येथून परतत होते. दरम्यान हा अपघात झाला आहे.
बयाबाई नंदनवार (५६), त्यांचा मुलगा महेश नंदनवार (२९), मुलगी अर्चना खापरे (३३) आणि प्रमोद धार्मिक (२२) अशी अपघात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे सर्व नागपुरातील पाचपौली भागातील रहिवासी आहेत अशी एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदनवार कुटुंब भिलवाडा येथून परतत होते जिथे ते त्यांचे जावई गणेश खापरे यांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी गेले होते.दरम्यान भोपाळ-नागपूर महामार्गावरील मोही घाटात रविवारी पहाटे त्यांच्या वाहनाला अपघात झाला.
अपघातात गंभीर जखमींना नागपूरला पाठवण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह पळून गेला असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.