योजनेचे पाइप आले, लवकर कामाचे भूमिपूजन
जामखेड – अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसवणाऱ्या जामखेड शहरासाठी वरदान ठरलेल्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून उजनी पाणी योजना गेल्या अनेक वर्षांपासून लालफितीत अडकलेली होती, मात्र अखेर पाणी योजनेला मुहूर्त सापडला. पाणी योजनेसाठी लागणारे पाईप येऊन पडले असून लवकरच या कामाचे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात होणार आहे. या योजनेसाठी आ. राम शिंदे यांच्यासह आ. रोहित पवार यांनी विशेष प्रयत्न करून ही योजना मंजूर करून आणली आहे. या योजनेचे काम पूर्ण झाल्यावर जामखेडच्या महिलांच्या डोक्यावरील हंडा खऱ्या अर्थाने उतरणार आहे.
गेल्या ते चार पाच वर्षापासून जामखेड तालुक्यात समाधानकारक पाऊस होत नसल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातील पाणी शहरासाठी कमी पडत होते. तसेच अपुऱ्या पावसामुळे तलाव देखील उन्हाळ्यात कोरडा पडत होता. परिणामी शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला होता. सध्या देखील शहरात शासकीय टँकर व काही खासगी टँकरने नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा, यासाठी नागरिकांकडून मागणी होत होती.
तत्कालीन पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी देखील नगरविकास खात्याकडे मागणी केली होती. हीच मागणी लक्षात घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहिगाव (उजनी ) येथून ६४ किमी लांब आसलेली १७९. ९८ कोटी रुपयांची महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगोत्थान महाअभियाना अंतर्गत ही पाणीपुरवठा योजना मंजूर दिली होती. मात्र नंतर ही योजना अडगळीत पडल्यारखी झाली होती.
आमदार पवार यांनी निवडून आल्यानंतर या योजनेचा पाठपुरावा करून तांत्रिक मान्यता, सुधारित तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता आणि प्रत्यक्ष निधी मिळवणे ही सर्व कामे केली. मागील शासनाच्या काळात या योजनेचा केलेला प्रकल्प अहवाल हा खासगी कन्सल्टंटमार्फत करण्यात आला होता. त्यात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. जामखेड शहराचा जवळपास ४० टक्के भाग या योजनेतून वगळण्यात आला होता. अनेक भागांत पूर्ण दाबाने पाणी पोहोचण्याबाबतही प्रश्नचिन्ह होते.
ही बाब लक्षात आल्यानंतर आमदार पवार यांनी नाशिकच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांच्याकडील यंत्रणेमार्फत नव्याने प्रकल्प अहवाल तयार करून घेतला. पूर्ण दाबाने पाणी मिळेल, अशा प्रकारे आराखडा तयार केला. त्यामुळे या योजनेच्या प्रकल्पाच्या किमतीतही वाढ झाली आहे.
दरम्यान, जामखेड- करमाळा रस्त्यावर या योजनेसाठी लागणारे पाईप आले असून रस्त्याच्या बाजूने मोजमाप सुरू करण्यात आले असून याबाबतची यंत्रणाही दाखल झाली आहे. लवकरच या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार असून दोन्ही आमदारांकडून या योजेनेबाबत दावा करण्यात येत आहे. ही योजना पूर्ण झाल्यास जामखेडचा पाणीप्रश्न कायमचा निकाली लागणार आहे. पाणी येणार असल्याने शहरातील उद्योगधंदे वाढीस येणारे आहे . सध्यस्थितीला जामखेड शहराला ८ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होतो. साधारण ४० हजार लोकसंख्या असणाऱ्या या शहराचा पाणी प्रश्न आजतागायत ऐरणीवर होता.
दहिगाव ते जामखेड ३४ किमीची योजना
करमाळा तालुक्यातील दहिगाव ते जामखेड अशी ६४ किमी अंतर असलेली ही पाणीपुरवठा योजना आहे. दहिगाव येथील उजनी बॅकवॉटर मधन ३५० एच.पी मोटारने पाणी उपसा करून करमाळा या ठिकाणी आणण्यात येणार आहे. करमाळा येथन जवळा ,नान्नज मार्गे ग्रॅव्हिटीने हे पाणी जामखेड जवळील चुंबळी या ठिकाणी बंद पाईपलाईन द्वारे आणण्यात येणार आहे. यानंतर चुंबळी या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र तयार करून नंतर पुढे पाईपलाईन द्वारे शहरात व उपनगरात अंडरग्राउंड नवीन पाईपलाईन टाकून नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
श्रेयवाद उफाळू येणार !
जामखेड तालुक्यातील विविध शासकीय निधीतील योजना म्हणजे सत्ताधारी राजकीय पक्षांच्या नेत्यांसाठी ‘मतदार संपर्क अभियान’च ठरू लागल्या आहेत. त्यातूनच राज्यातील सत्ता बदलानंतर योजनांच्या मंजुरीचा श्रेयवाद उफाळू लागला आहे. राज्य सरकारच्या संयुक्त निधीद्वारे राबवल्या जाणाऱ्या मंजूर होणाऱ्या जामखेड पाणी योजनांचा राजकीय श्रेयवाद रंगणार असून विशेषतः भाजपा व राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या खासदार-आमदार आणि त्यांच्या समर्थकांत हा श्रेयवाद अधिक उफाळला जाईल .