संगमनेर – स्थानिक शेतकऱ्यांच्या तोंडी मागणीवरून आश्वी खुर्द ग्रामपंचायतीने वादग्रस्त निर्णय घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने आश्वी खुर्द ते दाढ रस्त्याच्या कडेला लावलेली १०० ते १५० झाडे ग्रामपंचायत प्रशासनाने छाटण्याऐवजी थेट तोडल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले . ग्रामपंचायत पदाधिकारी व झाडे तोडणारा ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाईची मागणी वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
आश्वी खुर्द येथील बाजारतळ ते दाढ रस्त्यावरील कोकजे वस्तीपर्यत तसेच आश्वी – शिबलापूर रस्त्यावरील कॅनल ते भैरवनाथ मंदिर परिसरातील स्ट्रीट लाईटच्या तारेखालील झाडे तसेच शेतीचे नुकसान होत असल्याचे म्हणत स्थानिक शेतकऱ्यांनी तोंडी मागणीवरून ही झाडे छाटण्याची परवानगी ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागितली होती. दुसरीकडे वनविभागाला मात्र रात्रीच्या वेळी ये – जा करणाऱ्या नागरिकावंर बिबट्याचे हल्ले होत असल्याचे म्हणत झाडे छाटण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे एकाच परवानगीसाठी दोन वेगवेगळ्या विभागात दोन वेगवेगळी कारणे दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
आश्वी – दाढ रस्त्याच्या कडेला लावलेली सार्वजनिक बांधकाम विभागाची झाडे छाटण्याची परवानगी असताना ग्रामपंचायतीने दिलेल्या ठेकेदाराने मात्र ती खोडापासून तोडण्याचा घाट घातला. ही माहिती स्थानिक ग्रामस्थांना कळताचं सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड, बाबासाहेब भोसले, मोहित गायकवाड व संतोष भडकवाड यांनी धाव घेत झाडे तोडणाऱ्यांना जाब विचारला, मात्र तोपर्यंत लहान मोठी १०० ते १५० झाडे बेछूटपणे तोडण्यात आली होती.
लाखो रुपये खर्च करून दहा ते बारा वर्षे शासनाने जोपासलेली झाडे कोणताही मागचा पुढचा विचार न करता छाटण्याऐवजी थेट खोडापासून तोडल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री यांच्या पोर्टलवर देखील तक्रार करण्यात आली आहे. आश्वी खुर्द ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविला
स्थानिक ग्रामस्थांच्या लेखी तक्रारीवरून आश्वी खुर्द – दाढ रस्त्याच्या कडेला तोडण्यात आलेल्या ७२ झाडांचा पंचनामा केला असून त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला जाणार आहे. त्यानतंर प्राप्त आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल.
सुहास उपासनी, वनपाल, वनविभाग, संगमनेर भाग ३