कोपरगाव -दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना उपयुक्त आहे. महायुती सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या या जलयुक्त शिवार अभियान- 2 अंतर्गत कोपरगाव मतदार संघाचा 8.34 कोटींचा जलयुक्त शिवार आराखडा शासन दरबारी सादर करण्यात आल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली.
सरकारने जलयुक्त शिवार अभियान-2 सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोपरगाव मतदारसंघात या योजनेंतर्गत गाव निवडीच्या निकषानुसार मतदारसंघातील 23 गावांचे गाव आराखडे व पाण्याचा ताळेबंदास नुकत्याच झालेल्या बैठकीत तालुकास्तरीय समितीची मान्यता देण्यात आली आहे. हे गाव आराखडे तालुकास्तरीय समितीच्या मान्यतेने जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे. एकूण 23 गावांच्या 1 हजार 336 कामांसाठी 8.34 कोटीच्या कामांचा आराखडा आहे.
या अभियानांतर्गत कृषी, जिल्हा परिषद, लघु पाटबंधारे, ग्रामपंचायत, जलसंधारण, वन विभाग, सामाजिक वनीकरण आदी कामांचा समावेश आहे. योजनेंतर्गत या 23 गावांतील भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटणार असल्याचे आ. काळे म्हणाले.