पुणे-“शहरातील पाणी गळतीवर पालिकेचे आयुक्त तीच-तीच उत्तरे देत आहेत. कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत आणि पाणी गळती रोखली नाही, तर आयुक्तांनी राजीनामा द्यावा,’ अशी संतप्त प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.
शासकीय विश्रामगृह येथे शहरातील पाणीप्रश्नावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “पालिकेचे आयुक्त सांगतात की, शहरात 40 टक्के पाणी गळती आहे. शहराला वार्षिक 21 टीएमसी पाणीपुरवठा केला जातो. 40 टक्के गळती म्हणजे सुमारे आठ ते साडेआठ टीएमसी इतक्या पाण्याची गळती होते. जर ही गळती रोखली तर इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर आणि पुण्यालासुद्धा जादा पाणी मिळू शकते. मागील काळात भाजप, राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि कॉंग्रेस अशा सर्वच पक्षांची पालिकेवर सत्ता होती. सगळ्यांचाच हा प्रश्न आहे.
भामा आसखेडमधून पाणी मंजूर केले, जायका प्रकल्प मंजूर केला. तरीही वेळेवर कामे होत नाही, ही शोकांतिका आहे,’ अशा शब्दांत पालिकेच्या कारभाराबद्दल पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
राज्यपालांवर निशाणा
महापुरुषांबद्दल बोलत असताना अशी वक्तव्ये करू नयेत, की ज्याने लोकांच्या भावना दुखावल्या जातील आणि त्यांचा उद्रेक होईल. दि. 5 डिसेंबरला गुजरात विधानसभेसाठी मतदान आहे. ते झाल्यावर कदाचित राज्यपालांवर कारवाई केली जाईल. तसेच ज्यांनी हे विधान केले आहे, तेही म्हणतात “हमे जाना है,’ अरे जाना है तो जाने दो, अशा शब्दांत पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला.