पौड, (वार्ताहर) – मुळशी तालुक्यात विकासाच्या नावाखाली बर्याच वेळा वृक्षसंपदेची कत्तल केली जाते. काही वेळा वनविभागाची रितसर परवानगी घेतली जाते, तर बर्याच प्रकरणात वनविभागाकडे असणार्या अपुर्या मनुष्यबळाचा फायदा घेऊन कोणाच्या लक्षात येणार नाही हे गृहीत धरून मालकी क्षेत्रात विनापरवानगी अवैध वृक्षतोड केली जाते.
नुकतेच असेच एका प्रकरणात मौजे नेरे येथे घडला. विकासकाला विनापरवानगी वृक्षतोड करणे चांगलेच महागात पडले. या प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी तथा वृक्ष अधिकारी पौड (मुळशी) संतोष चव्हाण यांनी तब्बल आठ लाख रुपयांचा दंड बजावला आणि तो वसुलही केला.
दत्तवाडी (नेरे)येथील वसुंधरा सामाजिक उन्नती वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन सहकारी संस्था मर्यादित यांनी 7 मार्च रोजी मुळशी वनविभागाच्या भरे येथील कार्यालयात त्यांचे मालकीच्या 06 हे. 33.50 आर इतक्या क्षेत्रात त्यांनी सन 2016मध्ये लावलेले एकूण 400 वृक्ष व इतर नैसर्गिकरीत्या उगवलेले वृक्ष यांची अवैध वृक्षतोड झालेबाबत तक्रारी अर्ज दाखल केला होता.
अतुल साठे, बाबासाहेब बुचडे यांचेसह इतर 30-40 लोकांनी मिळून हे कृत्य केल्याचे तक्रारीमध्ये नमूद केल्यानुसार वनविभागाचे घोटावडे वनपरिमंडळ अधिकारी प्रज्ञा बनसोडे, कासारसाई नियतक्षेत्राचे वनरक्षक पांडुरंग कोपणर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी पौड यांच्या आदेशानुसार जागेवर जाऊन स्थळपाहणी केली व पंचांसमक्ष स्थळ पंचनामा नोंदवला असता त्यामध्ये सुमारे 800-850 झाडांची तोड झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पुढील चौकशीसाठी आरोपींना नोटीस बजावली असता आरोपी यांनी भरे येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात उपस्थित राहून वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांचा समक्ष दंड आकारण्यात आला व तो वसूल करण्यात आला.
सध्या या कारवाईची सर्वच स्तरातून चर्चा होत असून मालकी क्षेत्रातील अवैध वृक्षतोड प्रकरणात आजअखेर महाराष्ट्रातील सर्वात मोठी दंडात्मक कारवाई असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईमुळे मुळशीतील अवैध वृक्षतोड करणार्यांमध्ये खळबळ माजली असल्याचे दिसून येत आहे.
अवैध वृक्षतोड करणे हा कायद्याने गुन्हा असून कुठेही विनापरवानगी वृक्षतोड आढळल्यास त्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात येईन. वृक्षतोड करणे अनिवार्य असल्यास वनविभागाकडे रीतसर अर्ज दाखल करावा, प्रकरणाची शहानिशा करून व प्रकरणाची निकष तपासून रितसर परवानगी देण्यात येईन. -संतोष चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी पौड