सातारा (प्रतिनिधी) – सातारा पालिकेने तब्बल साडेसहा कोटी रुपयांची घंटागाडीची नव्याने निविदा काढली असून नव्या ठेकेदाराला काम देण्यात आले आहे . मात्र राधिका रोडवरील बारटक्के चौक, प्रतापगंज पेठ, मार्केट यार्ड परिसर व सातारा तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणचा कचरा अजूनही रस्त्यावर पडून असल्याने घंटागाडीवाले करतात काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य व्यवस्थितचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आल्याने सातारकर संताप व्यक्त करत आहेत.
सध्या सातारा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असून जनतेच्या प्रश्नाकडे पालिकेत प्रशासक राजवट असल्यामुळे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्वयंरोजगार संघटनेला हा घंटागाडीचा ठेका देण्यात आला आहे. पालिकेच्या चाळीस गाड्या प्रत्येक प्रभागातून धावत आहेत मात्र कचरा उचलण्यामध्ये होणारी कुचराई सार्वजनिक स्वच्छतेच्या मुळावर आली आहे.
मोती चौक आणि खण आळीच्या कोपऱ्यावर सकाळी नऊ वाजेपर्यंत कचरा तसाच पडून असतो. घंटागाडी कचरा उचलून डेपोत टाकेपर्यंत गाडीचा जीपीएस त्यांनी चालू ठेवायचा आहे. मात्र काही गाड्यांच्या नादुरुस्तीमुळे जीपीएस बंद आहे. प्रत्यक्षात घंटागाडीच्या किती फेऱ्या होतात हे समजत नाही.
घंटागाडी चालकाबरोबर एक क्लीनर गरजेचा आहे. मात्र सध्या चालकावरच काम भागवले जात आहे . काही घंटागाडीवाले रॉकेट प्रमाणे सुसाट पळत असतात. पेठा-पेठांमध्ये दोन दोन मिनिटे थांबणारी गाडी अर्ध्या मिनिटात स्वच्छ सुंदर साताऱ्याची पिपाणी वाजून लगेच गायब होते.
त्यामुळे त्यामुळे नागरिकांना कचरा टाकता येत नाही. परिणामी तो कचरा रस्त्यावर टाकला जातो शाहूपुरी कडे जाताना अर्क शाळेच्या लगत असणाऱ्या पवार कॉलनीमध्ये हीच कचऱ्याची समस्या आहे येथे घंटागाडी पोहोचत नसल्याची तक्रार आहे तामजाई नगर परिसरातील शिवनाथ कॉलनी तसेच कॅनॉल चा परिसर येथे इतका कचरा साठला आहे की समस्त हद्दवाढीतल्या करंजे ग्रामीण भागाची ती कचराकुंडी झाली आहे .
येथे कधीही ट्रॅक्टर अथवा घंटागाडी पोहोचत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत प्रशासक अभिजीत बापट यांचे सध्या सही करणे निविदा काढणे आणि धोरणात्मक कामाची अंमलबजावणी करणे असे कागदी घोडे नाचवण्याचे काम होत असल्याचा संताप नागरिकच व्यक्त करत आहे.
मात्र सातारा पालिकेचा कारभार मध्ये आंधळं दळतोय आणि कुत्र पीठ खाते असा सुरू असल्याने सातारकरांनी कोणाकडून अपेक्षा करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित घंटागाडीची ठेकेदार संस्था ही कर बुडवी असल्याचा आरोप मागच्या वर्षी झाला होता. या कंपनीने कामगारांचा पीएफ आणि जीएसटीच भरला नव्हता तरीसुद्धा अशा करबुडव्या ठेकेदारांनाच घंटागाडीचे ठेके देण्यात काय हशील आहे? याचे प्रश्नाचे उत्तर मुख्याधिकाऱ्यांना द्यावे लागणार आहे.
आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार
अपुरा पाणीपुरवठा शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य सार्वजनिक रस्त्यावर होणारी अतिक्रमणे यामुळे सातारकर वैतागलेले आहेत. बऱ्याच निविदा या बिलो टेंडर किंवा ओव्हर टेंडर असा सरसकट राजी खुशीचा मामला नगरपालिकेत सुरू आहे. यामध्ये बांधकाम विभागाचे अभियंता ठेकेदार झाले असून त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही.
आरोग्य विभागाचा कारभार अशा कर्मचाऱ्याकडे देण्यात आला आहे. ज्याची लाच प्रकरणांमध्ये चौकशी झाली होती जो स्वतःच्या कामावर श्रद्धा ठेवणारा नाही, त्याला आरोग्य विभागाचा कारभारी केलाच कसा ? असा दुसरा रोखठोक सवाल सातारकरांचा आहे.