पुणे -इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता निकालाबाबत अंतर्गत मूल्यमापनाचे निकष ठरविण्याची शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची (विद्या प्राधिकरण) लगबग सुरू आहे.
काही तज्ज्ञ मंडळी अभ्यासपूर्णरित्या सर्वसमावेशक असा अंतर्गत मूल्यमापन आराखडा तयार करत आहेत. दरम्यान विद्यार्थी ,पालक, शिक्षक या सर्वांचे आराखड्याकडे लक्ष लागले आहे.
परीक्षा रद्द करण्याच्या शासन निर्णयानंतर दहावीचा निकाल कसा तयार करायचा, याबाबत चर्चा सुरू होती. अंतर्गत मूल्यमापन करुन निकाल लावण्यासाठी शाळांची तयारी आहे का याबाबत सर्वेक्षण करण्यात आले.
विद्या प्राधिकरणाकडून तीन दिवस मोहीम राबवण्यात आली. यात राज्यातील 82.84 टक्के शाळांनी अंतर्गत मूल्यमापन करण्यास होकार, तर 17.23 टक्के शाळांनी अंतर्गत मूल्यमापन करणे शक्य नसल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट केले.
इयत्ता अकरावी प्रवेशासाठी एक स्वतंत्र ‘सीईटी’ घेण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरू केलेल्या आहेत. यासाठी सर्वेक्षणाद्वारे विद्यार्थ्यांकडून माहिती मागविण्यात आली होती.
यात राज्यातील 65.01 टक्के विद्यार्थ्यांनी ‘सीईटी’ घेण्यास होकार दिला आहे तर 34.99 टक्के विद्यार्थ्यांनी ‘सीईटी’ परीक्षा घेण्यास नकार दिला आहे.
या दोन्ही सर्वेक्षणांचा अहवाल प्राधिकरणाने शासनाकडे पाठवला आहे. अंतर्गत मूल्यमापन आराखडा कोणी तयार करायचा यावरुन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विद्या प्राधिकरण यांच्यात वाद निर्माण झाला होता.
राज्य मंडळाचे काम केवळ परीक्षा घेण्याचे, तर मूल्यमापन तयार करण्याचे काम हे विद्या प्राधिकरणाचेच असल्यावर अखेर शिक्षण विभागाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले.