पिंपरी, दि. 2 (प्रतिनिधी) – आधीच पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना खूपच कमी मार्गांवर सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या पीएमपीएमएलने आणखी महत्त्वाच्या मार्गाची बससेवा बंद करत पिंपरी-चिंचवडकरांच्या गैरसोयीत वाढ केली आहे. प्रवाशी संख्या कमी असल्याचे कारण देत पीएमपी प्रशासनाने येरवडा मार्गे जाणारी मोशी ते पुणे स्टेशन बस सेवा बंद केली आहे.
पीएमपीच्या या निर्णयाने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ही थेट बससेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी मोशी परिसरातील नागरिक करत आहेत. तरी देखील प्रशासन अद्याप त्याबाबत सकारात्मक नसल्याचे दिसते. मोशी, चाकण परिसरातून पुणे शहरात जाण्यासाठी वाकडेवाडीमार्गे चाकण ते पुणे स्टेशन किंवा मोशी ते पुणे स्टेशन या मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. तरीही पीएमपीएल प्रशासनाने बस सेवा सुरु करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
मोशी परिसरातून कामासाठी पुण्यात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक आहे. त्यांच्यासाठी अनेक वर्षांपासून राजगुरुनगर ते पुणे स्टेशन, चाकण ते मनपा अशी नियमित बससेवा सुरू होती. राजगुरुनगर ते पुणे स्टेशन हा सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा मार्ग मपीएमपीएमएल ने जाहीर केला होता. या मार्गावर प्रवासी संख्येत देखील वाढ होत होती. राजगुरुनगर येथून आलेल्या बसमध्ये प्रवाशांची संख्या अधिक होती. त्यामुळे ही बस मोशी आणि इतर बस थांब्यावर थांबत नव्हती. त्या विरोधात मोशीतील नागरिकांनी वेळोवेळी रोष व्यक्त केला होता. त्यानंतर पीएमपीएलने मोशी ते पुणे स्टेशन, येरवडा मार्गे बस सेवा सुरू केली होती.
नागरिकांची मागणी वाकडेवाडीमार्गे चाकण ते पुणे स्टेशन किंवा मोशी ते पुणे स्टेशन अशी होती. त्याकडे, दुर्लक्ष करून काही दिवसांतच प्रशासनाने मोशी ते पुणे स्टेशन (येरवडा मार्ग) बंद केला. पिंपरी चिंचवड मनपाकडून पीएमपी बस संचलनासाठी नागरिकांच्या करातूनच पैसे दिले जातात. असे असताना मोशी परिसरातील नागरिकांची गैरसोय का ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
विश्रांतवाडीला कामानिमित्त जावे लागते. बसची सेवा असताना त्यामधून रोज यायचो. आता बस बंद केल्यावर आम्ही जाणार कसे. दुचाकीवरून रोज जाणे परवडत नाही. त्यामुळे पुन्हा या मार्गावर बससेवा सुरू करावी.
– सुरेश देवरे, नोकरदार.