– आशा माहुले
जैन धर्मीयांमध्ये पर्युषण महापर्वाचे एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. मन-वचन-कायेने धर्माचरण करीत असताना तीर्थंकरांनी सांगितलेल्या दहा प्रमुख लक्षणांचे आचरण करून समाजोन्नतीबरोबरच आत्मोन्नतीचा मार्ग सांगणारा हा पवित्र काळ आहे.
जैन धर्मीयांमध्ये दिगंबर पंथात भाद्रपद महिन्यातील ऋषी पंचमी ते अनंतचतुर्दशी या दहा दिवसांतील पर्युषण महापर्वात या दशलक्षणांचे आचरण, अनुसरण विशेषत्वाने मानले जाते.
आत्मशुद्धीच्या अथवा आत्मकल्याणाच्या हेतूने या पवित्र काळात हे धर्माचरण केले जाते. आपल्या आत्म्याचे खरे स्वरूप ओळखून त्याचे चिंतन करायचे, आत्मज्ञानात रमून आत्मिक सौख्य प्राप्त करायचा हा मार्ग आहे.
मोक्षप्राप्तीच्या मार्गावर चालण्यासाठी दाखविलेला एक मार्ग म्हणजे हे धर्माचरण आहे. जो जीवाला दुःखातून काढून वितराग सुखाच्या मार्गाकडे नेतो, त्याला धर्म म्हणतात. धर्म म्हणजे धारण करणे, आचरण करणे. आत्म्याच्या विशुद्धीसाठी मोहाने आसक्त झालेल्या जीवाचे लक्ष योग्य मार्गावर आणण्यासाठी या पर्वाचे विशेष महत्त्व आहे.
धर्म सर्वांसाठी एकच आहे, पण तो समजण्यासाठी त्याची दहा लक्षणांमध्ये विभागणी केली आहे. त्यालाच दशलक्षण म्हटले आहे आणि दहा दिवसांत प्रत्येक लक्षणाचे आचरण म्हणजेच दशलक्षण पर्व अर्थात पर्युषण पर्व! भाद्रपद महिन्यातील या पर्वात उपवास, तप, ध्यान, पूजा, दान यांद्वारे आत्म्याला उज्ज्वल बनविले जाते.
धर्मसंस्कार, धर्मसंस्कृती आणि त्यांच्या अंगीकारातून धर्मरक्षण अशी ही या पर्वाची सांगड दहा “उत्तम’ लक्षणांमधून सांगितली आहे. उत्तम क्षमा, उत्तम मार्दव, उत्तम आर्जव, उत्तम शौच, उत्तम सत्य, उत्तम संयम, उत्तम तप, उत्तम त्याग, उत्तम अकिंचन्य आणि उत्तम ब्रह्मचर्य अशा या “उत्तम” लक्षणांमधून तीर्थंकरांनी सांगितलेल्या मार्गावरून जैनबांधव जीवनकार्यातून मोक्षसाधनेपर्यंतचा काळ व्यतीत करतात.
पर्युषण महापर्वातील प्रत्येक दिवशी यातील एका लक्षणाचे आचरण करून शरीर आणि मन शुद्धीचा प्रयत्न करतात.
रोजच्या मोहरूपी संसारचक्रात अडकून न पडता आत्म्यकल्याणासाठी प्रयत्न केला जातो. मुनी, त्यागी, गुरू विशेष रूपाने धर्म प्रभावना करून धर्माचे तत्त्व व धर्माचरणाचे महत्त्व सांगतात. या प्रत्येक लक्षणाला विशेष अर्थ आहे. क्षमा धर्म पाळल्याने विनम्रता येते. संयमामुळे इंद्रिय ताब्यात ठेवता येते. सत्य, त्याग, तप, ब्रह्मचर्य हे व्यक्तीला मोहापासून दूर ठेवतात.
जैन धर्मीयांचे मुख्य आचरण सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान व सम्यक चरित्र या रत्नत्रयी वर आधारित आहे. हाच धर्माचा मूळ पाया आहे. मोक्ष पदाला जाण्याचा मार्ग आहे. व्यवहारी जगात वावरतानासुद्धा या दशलक्षणांचे पालन केल्यास एक उत्तम व्यक्ती, उत्तम साधक आदर्श आचरणशील व्यक्ती म्हणून कायापालट होऊ शकतो. जी आज काळाची गरज आहे.