– प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर इतिहासपुरुषाला जन्म देणारी माता किती महान असेल, याबद्दल सामान्य वाचकाला जिज्ञासा असते. दिनकर विष्णू काकडे यांनी “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री… भीमाबाई आंबेडकर’ हे छोटेखानी चरित्र लिहून ती जिज्ञासा पूर्ण केली आहे. बाबासाहेब यांच्या जडणघडणीत वडील रामजी व आई भीमाबाई यांनी घेतलेले कष्ट, परिश्रम व संस्कार यांचा मोलाचा वाटा आहे. एकूण दहा प्रकरणात नेमक्या आणि योग्य शब्दांत हे चरित्र एकाच बैठकीत वाचता येण्यासारखे आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या गावात सुभेदार मेजर लक्ष्मणराव मुरबाडकर या श्रीमंत पित्याच्या पोटी भीमाबाईचा जन्म झाला. वडील लक्ष्मणराव हे आधी मराठा पलटणीत व नंतर 106 सॅपर्स अँड मायनर्समध्ये सुभेदार होते. भीमाबाईंच्या लहानपणीचे वर्णन पहिल्या प्रकरणात लेखकाने यथायोग्य केले आहे. इ.स. 1867 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी भीमाबाईंचा विवाह रामजी सकपाळ यांच्याशी झाला.
रामजी इंग्रजी सैन्याच्या 106 सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत नाईक पदावर होते. रामजी राजबिंडा, बुद्धिमान, धैर्य, शौर्य यांचा संगम असलेला, तारुण्यानं मुसमुसलेला तरुण होता. त्यांच्यात ज्ञान, विनय आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम होता, असे लेखकाने केलेले वर्णन चपखल आहे.
रामजी व भीमाबाई या दांपत्यांना चौदा अपत्य झाली. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली तर बाळाराम, आनंदराव व भीमराव ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान होते. रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण 1888 मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. या काळात रामजी व भीमाबाईंच्या पोटी भीमरावांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी झाला. आंबेडकरांचे कुटुंब महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबवडे या गावचे होते.
1894 मध्ये सुभेदार रामजी नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळीत दापोली या गावातील “कॅम्प दापोली’ वस्तीत कुटुंबासह राहण्यासाठी आले. दापोली कॅम्पात अधिकारांवरून, पंथावरून, राहणीमानावरून, पैशावरून वादविवाद होत असत. लष्करातील प्रस्थापितांच्याकडून उच्च-नीचपणामुळे मनाला चटके सहन करावे लागले. मुलांच्या खेळण्यावरून, तळावरील पाण्यावरून, त्यांची मुले व बायका भीमाबाईबरोबर सतत भांडू लागले. त्यामुळे 1896 मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडली व सातारा येथे येऊन ते राहिले.
वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षीच शाळेत कुशाग्र बुद्धीचे व हजरजबाबी, हुशार म्हणून भीमरावांचे कौतुक होत होते आणि अशा सुखासमाधानाचा व श्रमसाफल्याचा काळ आला असतानाच मस्तकशूळ या आजाराने भीमाबाईंचे निधन झाले. सुभेदार रामजीच्या कुटुंबांवर जणू आभाळ कोसळले. संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे.
मुखपृष्ठ – सतीश बारस्कर / प्रकाशक – स्वरूप प्रकाशन / पृष्ठे – 112 किंमत – 200/-