नवी दिल्ली – उत्तराखंड, हिमाचल यांसारख्या पर्वतांवर पावसाने कहर केला आहे. दुसरीकडे मान्सूनने मैदानी भागात हजेरी लावली आहे. दरम्यान, ऑगस्टनंतर सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा अर्थ या मोसमाच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत मान्सून अल्प पावसाने संपेल. तथापि, साधारणपणे 94 टक्के ते 106 टक्के पडणारा पाऊस सरासरीचा मानला जातो.
सप्टेंबरमध्ये भारतातील 36 पैकी 32 हवामान उपविभागांमध्ये सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 94% किंवा त्यापेक्षा कमी पाऊस असेल, असा अंदाज युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग, यूकेचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी व्यक्त केला आहे. प्रमाणानुसार, सप्टेंबरमध्ये तो सरासरीपेक्षा 20 मिमी कमी असेल. भारतीय हवामान विभागही(आयएमडी) पुढील आठवड्यात सप्टेंबरचा आपला अंदाज जाहीर करणार आहे. तथापि, आयएमडीने जुलैच्या अखेरीस आपल्या मध्य-मान्सूनच्या अंदाजात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
देवरस यांच्या मते हा एल-निनोचा प्रभाव आहे. हिंद महासागरातील द्विध्रुव आणि मेडेन ज्युलियन ऑसिलेशन यांनी जुलैमध्ये मान्सूनला ज्या प्रकारे मदत केली, ती आता राहिली नाही. एल निनो आता सर्व हवामान प्रणालीवर वर्चस्व गाजवत आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या विघ्नांमुळेही पाऊस येत नाही. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून वाहणाऱ्या उबदार वाऱ्यांमुळे सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात किमान उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात सामान्य पावसाची शक्यता कमी झाली आहे. ऑगस्टमध्ये आतापर्यंत 32% पावसाची कमतरता आहे, परिणामी संपूर्ण मान्सून हंगामात 7% तूट आहे.
हिवाळ्यातही पाऊस पडणार?
हवामान विभागानुसार, देशातील 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत सरासरी पाऊस झाला आहे. त्याच वेळी, अशी 6 राज्ये आहेत जिथे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. येत्या मार्च-एप्रिलपर्यंत “एल निनो’ या स्थितीत राहण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे, अशात मान्सूननंतर कमी पाऊस पडेल व हिवाळ्यात त्यानंतर पुढील वर्षीच्या मान्सूनपूर्वी मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे.