- उद्योगनगरीतील “त्या’ पीडितांना न्याय कधी मिळणार?
पिंपरी – उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण देश पेटून उठला आहे. अशाच काही घटना उद्योगनगरीत घडल्यानंतर त्यांचा तपास अद्यापही लागलेला नाही. अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांचे खून झाले. यातील काही घटनांना दहा वर्षांचा कालावधी लोटून गेला आहे. मात्र अत्याचार करून खून करणारे नराधम अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. आता तर पोलिसांनी तपास करणेही सोडून दिले आहे. त्यामुळे उद्योगनगरीतील “त्या’ पीडितांना न्याय कधी मिळणार? असा प्रश्न “हाथरस’च्या घटनेनंतर पुढे आला आहे.
दहा वर्षांपूर्वी घराबाहेर खेळत असलेल्या दिपाली कसबे या चार वर्षीय बालिकेने अपहरण करण्यात आले. निगडी जकात नाक्याच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर गळा दाबून तिचा खून करण्यात आला. या घटनेच्या तपासाकरिता त्यावेळच्या पुणे पोलिसांनी जंगजंग पछाडले. मात्र आरोपींचा शोध अजूनही लागलेला नाही. यामुळे दिपालीला न्याय मिळेल का, असा सवाल विचारणेही तिच्या घरच्यांनी सोडून दिले आहे.
या घटनेच्या दोन महिन्यानंतर अशाच प्रकारे घराबाहेरून आणखी एका चिमुरडीचे अपहरण करण्यात आले. तिच्यावरही अत्याचार करून खून करण्यात आला. तिचा मृतदेह कासारवाडी रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. एकामागोमाग घडलेल्या या घटनांमुळे पिंपरी चिंचवड शहरात खळबळ उडाली होती. या घटनेतील आरोपी शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
दोन वर्षांपूर्वी पिंपरीतील भाटनगर येथील एका लहान मुलीचे शेजारी राहणाऱ्या परप्रांतीय तरुणाने अपहरण केले. त्यानंतर एचए ग्राऊंड येथे तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या घटनेतील आरोपीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. मात्र आरोपी त्याच्या मूळगावी पळून गेल्याने आजपर्यंत तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तर दीड वर्षापूर्वी फुगेवाडी-दापोडी परिसरात सावत्र बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून घरातच तिचा खून केला. त्यानंतर तो पळून गेला. या गुन्ह्यातील आरोपीही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. यामुळे अल्पवयीन मुली घराबाहेर आणि घरातही असुरक्षित असल्याचे वेळोवळी दिसून आले आहे.
हाथरसच्या घटनेमुळे शहरात गेल्या काही वर्षांत घडलेल्या या घटना पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पिंपरी-चिंचवडसाठी पोलीस आयुक्तालय आता स्वतंत्र झाले आहे. हे पोलीस आयुक्तालय आणि येथील पोलीस या अल्पवयीन मुलींना न्याय मिळवून देतील का? अशी चर्चा पुन्हा शहरात जोर धरू लागली आहे.
मुलेही पडतात अत्याचाराला बळी
आठ वर्षांपूर्वी खाऊचे अमिष दाखवून नागसेननगर, चिंचवड येथील एका लहान मुलाचे अपहरण करण्यात आले. टेल्कोच्या तलावाजवळ नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले. या गुन्ह्यातील आरोपीचाही शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.