Santosh Bangar : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी एक नवं विधान केले आहे. नुकतेच बांगर यांनी मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत, तर फाशी घेईल, असे म्हंटले आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत. तसे झाले नाही तर स्वतः भर चौकात फाशी घेणार असल्याचे आमदार संतोष बांगर यांनी सांगितले. संतोष बांगर यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यापूर्वी देखील संतोष बांगर यांनी कळमनुरी बाजार समितीमध्ये सत्ता न आल्यास मिशी कापेल, असे चॅलेंज दिलं होतं. पण निवडणुकीनंतर येथे महाविकास आघाडीची सत्ता आली. महाविकास आघाडीने 12 जागेवर दणदणीत विजय मिळवला होता.
काय म्हणाले संतोष बांगर ?
“मी निकाल आमच्याच बाजूने लागणार हे सांगितले होते. २०२४ ला ठामपणे छाती ठोकून सांगतो येणाऱ्या एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक आहे. या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच पुन्हा येणार आहे. जर मोदी पंतप्रधान झाले नाही तर मी भरचौकात फाशी घेईन. या देशात मोदीच पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाहीत.” असं त्यांनी सांगितले. या विधानामुळे बांगर यांची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
दरम्यान, संतोष बांगर शिंदे गटात सामील झाल्यापासून अनेकदा त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा, असे विधान त्यांनी केले होते. यावरुन वाद निर्माण झाला होता. तसेच भोजन योजनेतील जेवण पुरवठा करणाऱ्या गोडाऊन मधील व्यवस्थापकास मारहाण आणि पिक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड करून कृषी अधीक्षकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी देखील ते वादात सापडले होते.