नवी दिल्ली : देशात करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने थैमान घातलं होतं. लाखो भारतीयांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला. करोना मृत्यूवरून मोठ्या प्रमाणात राजकारणही झालं होतं. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात पहिल्या लाटेत करोना संसर्ग वाढीसाठी महाराष्ट्र काँग्रेसला जबाबदार असल्याचा अजब दावा केला आहे. पंतप्रधान मोदी संसदेत बोलत होते.
मोदी म्हणाले की, करोना महामारीच्या काळात महाराष्ट्र काँग्रेसने मर्यादेचा कळस गाठला होता. राजकारण केलं. काँग्रेसने महाराष्ट्रातून मजुरांना स्थलांतर करण्यास भाग पाडलं. महाराष्ट्रातून कामगारांना रेल्वेचं तिकीट काढून पाठवून दिलं. काँग्रेसने अफवा पसरवून अडचणी आणखी वाढविल्या. त्यामुळे करोना परसविण्यास काँग्रेसच जबाबदार असल्याचा थेट हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी केला.
वास्तविक पाहता, राज्यात उद्धव ठाकरे यांचं सरकार असून काँग्रेस सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे राज्यातील मजुरांच्या स्थलांतरासाठी मोदी महाविकास आघाडी सरकार जबाबदार धरू शकत होते. मात्र मोदींनी केवळ काँग्रेसला का जबाबदार धरलं असा प्रश्न उपस्थित होतोय.
दरम्यान मजुरांचे झालेले हाल आणि करोना मृत्यूसाठी काँग्रेसने आधीच मोदी सरकारला अनेकदा जबाबदार धरलं. मात्र आता मोदींनी काँग्रेसला देशात करोना पसरविण्यासाठी जबाबदार धरलं आहे.