लखनौ – उत्तर प्रदेश सरकारकडून वृत्तपत्रांमध्ये देण्यात आलेल्या जाहिरातीवरून मोठा वाद झाला होता. जाहिरातीत दाखविण्यात आलेला पूल कोलकाता येथील असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे भाजपवर चहुबाजूने टीका होत होती. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
पंतप्रधान मोदी यांनी मागील सात वर्षांच्या काळात एक दिवसही सुट्टी घेतली नाही. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात एकही दिवस सुट्टी घेतली नाही, अस दिनेश शर्मा यांनी सांगितले.
मोदी आणि योगींनी एकही दिवस सुट्टी न घेतल्यामुळे देश आणि राज्य विकासाच्या मार्गावर चालत असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले की, खरा देशभक्त तोच जो स्वत:साठी नव्हे तर समाजासाठी काम करतो. अशीच व्यक्ती बदल घडवून आणू शकते, असंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान भाजप हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भेदभाव करत नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशात एकही दंगल झाली नाही. भाजप पक्ष सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असल्याचे शर्मा यांनी नमूद केलं.