नवी दिल्ली – पंतप्रधान आणि भाजपला देशात “एकच पक्षीय राजवट” देशात स्थापित करायची आहे आणि त्यादिशेने त्यांची वाटचाल सुरू असून त्यासाठीच खासदारांना संसदेतून निलंबीत करण्यात आले आहे असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की संसदेच्या सुरक्षेचा भंग कसा झाला यावर निवेदन करावे अशी आमची गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी होती परंतु आमच्याच आघाडीच्या १४१ खासदारांना संसदेतून निलंबीत करण्यात आले. ज्यांनी या घुसखोरांना पास दिला ते भाजपचे खासदार संसदेत येऊ शकतात पण त्यावर प्रश्न विचारणारे खासदार मात्र संसदेच्या बाहेरच ठेवले जातात ही लोकशाहीची थट्टा आहे असे खर्गे यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, “संसदीय सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या वरिष्ठ अधिकार्यांना जबाबदार का धरले नाही? त्यांच्यावरही एव्हाना कारवाई व्हायला हवी होती. गेल्या अनेक महिन्यांपासून घुसखोर योजना आखत होते पण देशातील गुप्तचर यंत्रणांना त्याचा सुगावा लागला नाही या अपयशाला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी केला.
संसदेला बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था असताना, दोन घुसखोर त्यांच्या बुटात पिवळे गॅसचे डबे लपवून इमारतीत कसे घुसले आणि भारताच्या लोकशाहीच्या गर्भगृहात कसे पोहोचले, याबद्दल काँग्रेस प्रमुखांनी आश्चर्य व्यक्त केले. पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाला देशात एकपक्षीय राजवट प्रस्थापित करायची आहे. ते एक अकेला बोलतात जे लोकशाहीला उद्ध्वस्त करण्यासारखे आहे.
विरोधी खासदारांना निलंबित करून त्यांनी नेमके हेच केले आहे, असे खर्गे म्हणाले. सुरक्षेतील या लाजिरवाण्या चुकीसाठी उच्च पदावरील लोकांना शिक्षा करण्याऐवजी त्यांनी खासदारांचे लोकशाही अधिकार हिरावून घेतले आहेत आणि जबाबदारीपासून पळ काढला आहे,असा आरोपही खर्गे यांनी केला.