पुणे (प्रतिनिधी) : राज्य शासनाने पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना गावी पाठविण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी. निधी अभावी विद्यार्थ्यांना गावी पाठविण्यास अडचण येत असल्यास प्राथमिक कर्तव्य समजून विद्यार्थ्यांच्या सार्वजनिक वाहतुकीचा खर्च करण्यास तयार असल्याचे पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने म्हटले आहे.
लॉकडाऊन मुळे पुणे शहरात मोठया प्रमाणावर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी अडकून पडले आहेत. मेस बंद असल्याने या विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल सुरू आहे. अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या विद्यार्थ्यांना गावी पाठवावे अशी मागणी शासनाकडे करत आहेत.
मनसे नेते अमित ठाकरे यांनी देखील या विषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून विद्यार्थ्यांना गावी जाऊ देण्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर तातडीने याबाबत हलचाल सुरू झाली व विद्यार्थ्यांची एक बस रवाना देखील झाली. मात्र यानंतर प्रशासन पुन्हा सुस्तावले व याबाबत काहीच हालचाली होत नसल्याने विद्यार्थी देखील चिंताग्रस्त झाले.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांना निवेदन पाठवून विद्यार्थ्यांना निःशुल्क गावी पाठविण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. आता तरी प्रशासनाने लवकर हालचाली करून विद्यार्थ्यांसाठी बसेस उपलब्ध करून घ्याव्यात अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आली आहे.