जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, या दृष्टिकोनातून लोकहिताची, विकासासाठी सतत कार्यमग्न राहून, सर्वसामान्यांच्या अडीअडचणींसाठी स्वतः धावून जाणारे, सर्वांना आपलेसे करणारे, सत्याची जाण ठेवणारे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देऊन त्यांच्या विचारांची कदर करणारे, लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना हवेहवेसे वाटणारे, शांत, संयमी नेतृत्व म्हणजे सर्वांचे आमदार मकरंदआबा पाटील. आज त्यांचा वाढदिवस, त्यानिमित्त….
माजी खासदार व जिल्ह्याची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांच्याकडून “यशवंत’ विचारांचा वारसा घेऊन तो आ. मकरंदआबांनी यशस्वीरित्या पुढे चालवला आहे. घरची परिस्थिती संपन्न असतानाही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या वाई तालुक्यातील बोपेगावचे भूमिपुत्र आबांनी आपल्या तालुक्यासाठी, गावासाठी काही तरी करायचे, हा ध्यास मनी घेऊन वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेत राजकीय जीवनाला सुरवात केली. गावकऱ्यांच्या आग्रहाने बोपेगावच्या सरपंचपदाची धुरा स्वीकारून समाजकार्याला सुरवात केली. तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर. आर. पाटील (आबा) यांनी लोकांना दिलेल्या ग्रामस्वच्छतेच्या हाकेला प्रतिसाद देत, हातात फावडे घेऊन स्वतः कामाला सुरुवात करून, यशस्वी ठरलेला सरपंच म्हणजेच वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघाचे सध्याचे लोकप्रिय आ. मकरंद पाटील होय.
सोशल इंजिनिअरिंगमध्ये विशेष रस असलेल्या मकरंदआबांनी सुरवातीपासूनच तात्यांकडे येणाऱ्या प्रत्येकाची आस्थेवाईकपणे चौकशी करता करता लोकसेवकाची भूमिका अंगीकारली.कार्यकर्ते व जनतेबद्दलची तात्यांची तळमळ व हातात घेतलेले जनहिताचे काम पूर्ण करण्याची जिद्द, यातून आबांचे नेतृत्व फुलत गेले. आमदारकीची माळ गळ्यात पडल्यावर आबा गावागावातील जिवाभावाच्या माणसांसाठी धडपडले. विकासाचा नवा पहाड उभा केल्यानेच मकरंदआबा वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा मताधिक्याने निवडून आले.
मतदारसंघातील प्रत्येक वाडीवस्तीवर आबांचा स्वतः राबता असल्याने, तेथील लहानथोर मंडळीना ते आपलेसे वाटतात. आबांचे “नेटवर्क फुलटाइम’ असल्याने मतदारसंघाच्या विकासासाठी ते 24 तास उपलब्ध असतात. त्यातून त्यांचे वेगळेपण सिद्ध होते. समाजकारणाबरोबर राजकारण लीलया करणाऱ्या आबांचे व्यक्तिमत्व आदर्श आहे. करोनाच्या भीषण संकटात मतदारसंघातील जनतेला आधार देत, शासकीय यंत्रणा सक्रिय केली. स्वतःला करोनाचा संसर्ग झाला तरी बाधित रुग्णांना सहकाऱ्यांच्या मदतीने जेवणापासून गोळ्या, इंजेक्शन उपलब्ध केली. तात्यांनी दाखवलेल्या सामाजिक सेवेच्या वाटेवर त्यांचा आदर्श समोर ठेवून मतदारसंघातील जनतेच्या सुखासाठी आबा अहोरात्र काम करत आहेत
मकरंदआबांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, ते लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना आपुलकीने संबोधतात. त्यामुळेच ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहेत. राज्यातील कर्तबगार, मनमिळाऊ आमदार, अशी त्यांची ओळख आहे. हजारो हात एकत्र आणून, नि:स्वार्थीपणे समाजकारण करण्याची धमक मकरंदआबांमध्ये आहे. आबा जेथे जातात, तेथे ते कार्यकर्त्यांचा गराड्यात दिसतात. काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. कार्यकर्त्यांच्या नुसत्या मोबाइल संपर्कावर काम तडीस नेण्याची आबांची पद्धत न्यारी आहे.
स्पष्टवक्तेपणा जपणारा, सर्वसामान्यांच्या दुःखावर फुंकर घालणारा, अडीअडचणींमध्ये धावून येणारा, कार्यतत्पर, कार्यासम्राट आमदार लाभला, हे या मतदारसंघाचे परमभाग्य आहे. वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातील विकास गतिमान ठेवण्याचा शब्द आबांनी जनतेला दिला होता. या शब्दाला पक्के असलेले मकरंदआबा राजकारणापेक्षा लोकहिताला प्राधान्य देतात. या नेत्याला जन्मदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
– सौ. शीला बापू जाधव,
ग्रामपंचायत सदस्य, शेंदुरजणे, ता. वाई